Tuesday, December 4, 2007

ग्रीन संमेलन

सांगली येथे येत्या जानेवारीत भरविले जाणारे ८१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ’ग्रीन’ करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे. सर्वसाधारणपणे ग्रीन या शब्दाचा ’हिरवे ’ वा ’हरित’ असा अर्थ घेतला जाऊन ’ग्रीन’ म्हणजे हिरवळ, बागबगीचा यांची योजना करून आल्हाददायक निसर्गसुंदर वातावरण तयार करणे असे समजले जाते. मात्र जागतिक पातळीवर ’ग्रीन’ हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यात या शब्दाची व्याप्ती खूपच विस्तारलेली धरली जाते. प्रदूषण टाळून पर्यावरणास पोषक असणाऱ्या व ऊर्जा तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करण्याच्या, कोणत्याही स्वयंप्रेरणेने केलेल्या कृतीस ’ग्रीन’ संबोधले जाते.

उद्योगधंदे आणि लोकसंख्या वाढ यामुळे हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण आणि सजीव सृष्टिची होणारी हानी सारख्या घटना जगाच्या चिंतेची बाब बनली आहे. त्यातच आम्ल पर्जन्य, जागतिक तापमानात होणारी वाढ यासाऱख्या पृथ्वीवरील पर्यावरणास धोका पोहोचविणाऱ्या घटनांनी मानवाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे याविषयी लोकजागृती करून प्रभावी उपाययोजना करणे राज्यकर्त्यांना भाग पाडावे व व्यक्तीपासून समाजापर्यंत सर्व थरावर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न व्हावेत या हेतूने ’ग्रीन’ चळवळीस प्रारंभ झाला. प्रदूषण नियंत्रण व निसर्ग संवर्धन ही उद्दिष्टे ठेवून सुरू झालेली ही चळवळ मानवी व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात पोहोचणे आवश्यक आहे. ग्रीन ही एक विधायक विचारधारा आहे व जनमानसामध्ये याचे महत्व पटवून देण्याचे कार्य साहित्यिक उत्तमपणे करू शकतात. याच हेतूने सांगलीचे संमेलन ग्रीन करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे.

पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या प्लॅस्टिक, थर्मोकोल, विषारी धातू व रसायनमिश्रीत रंग व सुगंधी द्रव्ये न वापरणे, कागद, कापड, बांबूजन्य पदार्थ, नारळाच्या झावळ्या व काथ्या, ज्यूट यांचा वापर करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून आणि नेहमीच्या ट्यूब व बल्ब ऎवजी सी.एफ.एल. वा एल. ई. डी.चे दिवे वापरून ऊर्जाबचत करणे इत्यादी उपाययोजना यांचा समावेश ग्रीन संकल्पनेत केला जातो.

या संमेलनासाठी बांधकामातील निरुपयोगी झालेल्या लाकडी फळकुटे, बांबू, फुटक्या तुट्क्या फरशा, काचा, आरसे, या सारख्या वस्तूंचा उपयोग करून व त्यांचे रूप पालटून कलात्मक रितीने मंडप व परिसर यांची सजावट केली जाईल. पुरेशा स्वच्छ्तागृहांची व्यवस्था करून सर्व सांडपाण्याचा पुनर्वापर व अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होईल आणि सर्व परिसर स्वच्छ, प्रदूषणमुक्त राहील याची विशेष काळजी घेतली जाईल. रस्त्याकडेने फुलझाडांच्या कुंड्या लावून परिसर सुशोभित केला जाईल. प्लॅस्टिक पिशव्यांऎवजी कागदी वा कापडी पिशव्या व प्लॅस्टिक कप ऎवजी कागदी कप वापरण्याचा आग्रह धरला जाईल. कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी आकर्षक संकलक बसविले जातील. सत्कारासाठी पुष्पगुच्छ व हार तुरे यांचे ऎवजी रोपे वा बीजपाकिटे देण्याविषयी संयोजकांना आवाहन करण्यात येईल. कापडी माहितीफलकांचा उपयोग या ग्रीन संमेलनात केला जाईल. संमेलन परिसरात धूम्रपान वा मद्यपानास बंदी राहील. महाराष्ट्र ऊर्जा विकास मंडळाच्या सहकार्याने सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून प्रकाशयोजना केली जाईल. झगमगीत व डोळे दिपविणाऱ्या प्रकाशयोजनेऎवजी आवश्यक तेथे व आवश्यक तेवढ्या प्रमाणात सुखकर प्रकाश योजना केली जाईल. अंतर्गत सजावटीसाठी वापरता येणाऱ्या ग्रीन व पऱ्यावरणास पोषक वस्तूंचे प्रदर्शन मांडल्यास समाज प्रबोधनासाठी याचा चांगला उपयोग होईल.ग्रीन संमेलन परिसरात वाहने आणण्यास बंदी राहील व वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली जाईल. सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली इंजिनिअर्स ऍण्ड आर्किटेक्ट्स असोसिएशन च्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. सांगलीतीलच ज्ञानदीप फोंडेशनने सौरऊर्जा, ग्रीन बिल्डींग आणि ग्रीन सिटी या विषयांवर कोल्हापूर, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी कार्यसत्रे घेतली असून ग्रीन सिटी पोर्टल डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यात या विषयातील प्रयोगशील व तज्ज्ञ व्यक्तींचे अभ्यासपूर्ण लेख तसेच ग्रीन तत्वावर आधारलेल्या वास्तूंची छायाचित्रे आहेत.

बांधकाम क्षेत, नगरपालिका व कारखाने यांचेसाठी ग्रीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सर्व ठिकाणी सुरू झाले असले तरी साहित्य संमेलनासारख्या समारंभासाठी ग्रीन व्यवस्थेचा हा प्रयोग अभिनव म्हणावा लागेल. समाज व संस्कृतीचे जतन व दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या साहित्यिकांना ग्रीन कल्पनेचे महत्व पटेल व ते ही विचारधारा अधिक प्रभावीपणे जनमानसात रुजवू शकतील. मग या कल्पनेचा विस्तार गावातील जत्रा, आठवड्याचा बाजार, गणेशोत्सव वा लग्नसमारंभ यासारख्या लोकसंमेलनात होऊ लागेल आणि ग्रीन चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

Monday, December 3, 2007

वाढदिवस

आज माझा वाढदिवस. वाढदिवस साजरा करण्याइतका मी आता लहान राहिलो नाही समजूनसुद्धा मनात यादिवशी विलक्षण विचारांचे काहूर उठले. अगदी सामान्य घटना म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे विचार झटकून टाकायचे म्हटले तरी पुन्हा पुन्हा आपण मोठे झाल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करीत होती.
आयुष्याच्या या महत्वाच्या कालखंडात मी काय मिळविले व काय गमावले याचा ताळेबंद करण्याची इच्छा झाली पण ’मी’ म्हणजे कोणी? या प्रश्नाशीच विचारांची वावटळ उठली. मी, स्वत:च्या नजरेतून मी, आई वडिलांच्या नजरेतून पहिला मुलगा, पत्नीच्या नजरेतून पती, मुलांच्या नजरेतून बाबा, सहकार्‍यांच्या नजरेतून मित्र, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षक, राष्ट्राच्या नजरेतून एक सर्वसामान्य नागरिक, मानवजातीच्या नजरेतून या कालखंडात जगत असणार्‍या असंख्य मानवप्राण्यांपैकी एक, पृथ्वीच्या नजरेतून एक यकश्चित क्षणभंगुर सजीव, विश्वाच्या नजरेतून तर पूर्णपणे नगण्य, बिदुरूप व क्षणमात्र आस्तित्व. जसजसा मी स्वत:पासून दूर दूर जाऊ लागलो, तसतसे माझे महत्व, माझे कर्तृत्व, किंबहुना माझे अस्तित्वही कमी कमी होत जात आहे व विश्वाच्या पसार्‍यात मी स्वत:लाच पूर्णपणे हरवून जातो आहे असे वाटले. मन क्षणभर सुन्न झाले पण दुसर्‍याच क्षणी अनुभूतींच्या क्षेत्रात उलट क्रम असल्याचे मला जाणवले. विश्वाच्या पसार्‍यात मी नगण्य असलो तरी माझ्या जाणिवेच्या व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्वाचा पसारा नगण्यच होता व याच उलट क्रमाने विचार करता मला माझे स्वत्व सर्वात उत्तुंग व अंतर्बाह्य आकलन झालेले वाटू लागले.
तरीसुद्धा माझी वैज्ञानिक दृष्टी मला इतरांपेक्षा आगळे वेगळे महत्व देण्यास तयार होईना. माझ्याप्रमाणेच इतरांच्या आशा आकांक्षा, भावभावना व स्वत:विषयी तेवढ्याच प्रमाणात तीव्र जाणीवा असणार हे मला उमगले होते. त्यामुळे मी म्हणजे कोणी अलौकिक, असामान्य आहे असा भ्रम माझ्या मनात झाला नाही. ज्यावेळी असा भ्रम होतो तेव्हाच स्वत:ची स्मृती चिरंतन करण्याचा ध्यास माणसाला लागतो व त्यातून आत्मचरित्राचा प्रपंच उभा राहतो. लोक आत्मचरित्र का लिहितात? मी लिहावे का? का मी लिहावे? आपल्या जीवनात असे काही विलक्षण प्रसंग घडले आहेत का की ज्यामुळे लोकांना मार्गदर्शन होईल, शिकवण मिळेल वा निदान मनोसंजन तरी होईल? माझे कर्तृत्व एवढे मोठे आहे का की लोक माझ्यासारखे बनण्याचा ध्यास घेतील? माझ्या अंगात एवढा प्रामाणिकपणा व धाडस आहे का की मी माझ्या जीवनातील प्रसंग वास्तव रुपात सादर करेन. माझी अशी खात्री आहे का की माझ्या लिखाणातून नकळतही माझी वृथा स्तुती वा माझ्या कृतीचे आंधळे समर्थन होणार नाही ? या सर्व प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नाही असले तर मला आत्मचरित्राचा खरा अधिकार नाही असे माझ्या तर्कबुद्धीला वाटते आणि वरील प्रश्नांना ठामपणे होय असे उत्तर देण्याइतके माझे मन समर्थ नाही हे मला चाण्गले ठाऊक आहे. त्यामुळे मी स्वत;चे आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.
यापेक्षा मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. तो म्हणजे मनात येणारे विचार ग्रथित करण्याचा. स्मृती राहिली तर विचारांची रहावी व्यक्तीची नव्हे कारण विचारावाचून व्यक्ती म्हणजे नुसती सजीवता आहे. व्यक्तीवाचून विचार म्हणजे त्या व्यक्तीच्या भावजीवनाचे व बुद्धिप्रगल्भतेचे सार आहे. त्यास व्यक्तित्वाची पुटे चढली की ते निष्प्रभ व चाकोरीबद्ध होते. आपले विचार इतरांना मार्गदर्शक ठरतील एवढे प्रगल्भ आहेत क? पण सुदैवाने याची काही गरज नाही कारण विचार व भावना यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या विविधरंगी, विविधढंगी स्वरूपातूनच माणसास बरेच ज्ञान ग्रहण करता येते. मग ते विचार परिस्थितीशी मिळते घेणारे वा टक्कर घेणारे असोत ; भावना आशादायी वा पराभूत मनोवृत्तीच्या द्योतक असोत त्यांच्या परिशीलनाने माणसास विचारांचे व भावनांचे विविध पैलू लक्षात येतात. स्वत: विचार, भावनांना योग्य त्या प्रकारे आकार देण्याचे, बदलण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते. आणि त्यावेळी अगदी उलट परिणामही होऊ शकतात. पिचलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या सम्यक दर्शनातून एखादी व्यक्ती संघर्षास तयार व आशावादी होऊ शकते. अशी व्यक्ती त्यामुळे जीवनात यशस्वी होण्याची श्क्यता असते. त्यामुळे विचारांचे प्रकटीकरण व प्रसार यावर सर्वांनी भर दिल्यास विचारांची झेप व मर्याद याविषयी मानवसमूहाच्या सामूहिक ज्ञानात प्रत्यही भर पडत राहील.

म्हणूनच व्यक्तीगौरवाच्या भूमिकेतून नव्हे तर व्यक्तिनिरपेक्ष विचारदर्शनाच्या भूमिकेतून मनात येणारे विचार मांडण्याचे मी ठरविले आहे. अर्थात ते कोणी लगेच वाचोत वा न वाचोत. आज मला ठरवायचे आहे की नियमितपणे आपल्या विचारांना शब्दरूप देणे व कागदावर ते उतरविणे. आज वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या व्यक्तित्वाची वस्त्रे बाजूला ठेवून विचारांच्या पातळीवर उतरलो ही खचितच आनंदाची गोष्ट आहे.

मराठीसाठी युनिकोडचा वापर

भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनतेस सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले. मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा व एक लिपी नसल्याने माहितीच्या आदानप्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर सुरू झाला. अनेक संशोधक व्यक्ती आणि संस्थांनी भारतीय भाषांतील सुबक आणि सुंदर छ्पाईसाठी विविध संगणकीय लिपीसंच ( फॉंट) विकसित केले. जलद गतीने टंक लेखन करता यावे यासाठी विविध प्रकारचे कळफलक यासाठी वापरण्यात आले. मराठी, हिंदी आणि संस्कृत यासाठी एकच देवनागरी लिपीसंच वापरण्यात येऊ लागला.

मराठीपुरते बोलायचे तर मोड्युलर इन्फोटेकचे श्रीलिपी, व अंकुर श्रेणीतील फॉंट, सी डॅक चे योगेश, सुरेख हे फॉंट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, मिलेनियम वरूण यासारखे अनेक प्रकारचे फॉंट वापरून संगणकावर मराठी लिहिले जाते. मात्र त्यातील कळफलकाच्या मांडणीत विविधता असल्याने टंकलेखनात तसेच एका लिपीसंचातील मजकूर दुसर्‍या लिपीसंचात बदलताना अडचणी येऊ लागल्या. मग असे बदल करून देणार्‍या संगणक प्रणाली विकसित करण्यात आल्या.

संगणकावर मराठी वापरताना वा मराठीत संगणक प्रणाली विकसित करताना येणारी दुसरी अडचण म्हणजे शब्दांची वर्णानुक्रमे माडणी. संगणकावर ए, बी, सी अशा इंग्रजी वर्णमालेनुसार वर्गीकरण करण्याची सोय उपलब्ध होती मात्र मराठीतील अ, आ, इ व क, ख, ग या देवनागरी वर्णमालेप्रमाणे वर्गीकरणासाठी वेगळी संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक होते. भारत सरकारने यासाठी इंग्रजी आस्की ऎवजी भारतीय भाषांसाठी इस्की मानक तयार केले सी डॅकने आपल्या फॉंट साठी ही पद्धत वापरली.

मराठीचा वापर करताना संगणकावर मराठी फॉंट स्थापित करावा लागतो. इंटरनेटवर मराठी अक्षरे नीट दिसायची असतील तर पाहणार्‍याच्या संगणकावर असा फॉंट अस्णे जरूर असते. त्यामुळे मराठी भाषेतून संकेत स्थळ ( वेबसाईट) असेल तर त्या संकेतस्थळावर वापरलेला फॉंट डाऊनलोडसाठी ठेवावा लागे. तो आपल्या संगणकावर स्थापित केल्याशिवाय संकेतस्थळावरील माहिती वाचता येत नसे. साहजिकच या संकेतस्थळाचा वापर फार मर्यादित होता. फॉंट डाऊनलोड करावा लागू नये व संकेतस्थळावरूनच तो पाहणार्‍याच्या दर्शक पडद्यावर कार्यान्वित व्हावा असे डायनॅमिक फॉंट्चे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. फाँट डाऊनलोड न करता मराठी अक्षरे आपोआप इंटरनेटवर दिसू शकतील अशी ती व्यवस्था होती. यासाठी मायक्रोसॉफ्ट ने फॉंट चे इओटी मध्ये रूपांतर करण्यासाठी वेफ्ट प्रणाली विकसित केली. मात्र इंटरनेट एक्स्प्लोअरर शिवाय नेटस्केपसारख्या इतर ब्राऊजरचा ( दर्शक प्रणालींचा) वापर करणार्‍यांसाठी याचा उपयोग होईना. त्यांच्यासाठी बिटस्ट्रीमने फॉंटचे पी. एफ. आर तंत्रज्ञान विकसित केले. मात्र या पद्ध्तींच्या वापरासाठी लिपीसंच निर्माण करणार्‍या संस्थांकडून ते विकत घेणे आवशयक झाले. या डायनॅमिक फॉट चा वापर करून अनेक मराठी संकेतस्थळांची निर्मिती झाली.

विशिष्ट लिपीच्या कळफलकाची सवय झाल्याखेरीज सर्व सामान्य लोकांसाठी संगणकावर मराठीचा वापर करणे अशक्य होते. इंटरनेटवरील ई मेलच्या संपर्क सुविधेचा लाभ घेऊन लोक उच्चाराप्रमाणे मराठी भाषेतील मजकूर इंग्रजीमध्ये लिहून पाठवू लागले. वैयक्तिक संपर्कासाठी हे पुरेसे असले तरी त्यात सर्व उच्चार व अर्थातील छटा नीट दर्शवता येत नसत. यात प्रमाणीकरण करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांनी मराठी लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करण्यासाठी शास्त्रशुद्ध नियम तयार केले. मुंबईच्या श्री शुभानन गांगल यांनी ध्वनी व उच्चारावर आधारित व नेहमीचा कळफलक वापरून गांगल फॉंट विकसित केला व मोफत सर्वांसाठी खुला केला.

इंटरनेट व संगणकाचा वापर करताना चीन, जपान, रशिया यासारख्या वेगळ्या लिपींचा वापर करणाऱ्यांना इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागे. पूर्वीची ८ अंकांवर अक्षर चिन्ह ठर्विण्याची आस्की पद्धत इंग्रजी भाषेसाठी पुरेशी होती. मात्र जगातील सर्व भाषांतील अक्षरचिन्हे दर्शविण्यासाठी ती योग्य नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी ३२ अंकावर आधारित अशा युनिकोड ( एकमेव चिन्हप्रणाली ) लिपिसंचाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ्या संस्थांनीही आज ' युनिकोड ' चे तंत्र स्वीकारले. (www.bhashaindia.com) या मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर विंडोजसाठी युनिकोड मराठी कसे वापरायचे याची माहिती दिली अहे. श्री. ओंकार जोशी यांनी कोण्त्याही ब्राऊजरमध्ये वापरता येईल असे गमभन नावाची संगणक प्रणाली विकसित केली असून ती (http://www.var-x.com/gamabhana) या संकेतस्थळावर सर्वांसाठी मोफत ठेवली आहे. भारत सरकारच्या ' सीडॅक ' या संस्थेने ' युनिकोड ' आधारित मोफत फाँट्स आज सर्वसामान्यांसाठी इंटरनेटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केले आहेत . ' बराहा ' (www.baraha.com) सारख्या खाजगी वेबसाइटवरही आज असे फाँट्स मोफत मिळतात . बराहा व गमभन यांचे कळफलक फोनेटीक असल्याने कोणासही याचा वापर करून मराठी सहज लिहिता येते.

युनिकोडचा आणखी एक महत्वाचा पायदा म्हणजे लिप्यंतर किंवा एका लिपीतील मजकूर दुसर्‍यालिपीत वाचणे. उदा. युनिकोड गुजराती मजकूर आपण देवनागरीत सहजगत्या वाचू शकतो. ज्यांना गुजराती समजते पण लिपी वाचता येत नाही, त्यांना आजचा गुजरात समाचार / गुजराती ब्लॉग देवनागरीत वाचता येईल. तसेच मराठी लेख गुजराती लिपीत वाचता येतील, भाषेत नाही. म्हणजे या लेखाचे गुजरातीत भाषांतर होत नसून लिप्यंतर होऊ शकते. तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पुढे मागे भाषांतर देखील संगणकच करून देईल.

ब्राऊजरच्या नव्या आवृत्यांमध्ये युनिकॊडच्या सुविधेचा समावेश केला आहे. गुगल, याहू यासारख्या शोधयंत्रांनी युनिकोडचा स्वीकार केल्याने मराठी संकेतस्थळावरील माहितीचा शोध अशा शोधयंत्रावर घेणे शक्य झाले आहे . जगातील सर्व भाषांसाठी एकच अक्षरसंच वापरणार्‍या युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भाषा वा लिपी यांच्या विविधतेमुळे येणार्‍या अडचणी दूर होतील. हे तंत्र वापरून व त्या तंत्रावर आधारलेले टाइप ( फाँट ) आपल्या संकेतस्थळावर वापरून आज ' महाराष्ट्र टाइम्स ' सह अनेक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळे तयार झाली आहेत. नई दुनिया, रेडिफ मेल, जीमेल या संपर्क संकेतस्थळांनी तसेच आर्कुट, याहू, ब्लॉगस्पॉट या चर्चा व्यासपीठानी मराठीसह अन्य भाषांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जगभर पसरलेले हजारो मराठी तरूण हे फाँट्स वापरून आज ' ऑर्कुट ' सारख्या संकेतस्थळावर मराठीतून गप्पागोष्टी करीत आहेत . नव्या पिढीतील शेकडो मराठीप्रेमी व्यक्तींनी ' युनिकोड ' वर आधारलेल्या मराठी ब्लॉग्जवर विविध विषयांवर मराठी लेखन केले आहे.

ज्ञानदीपने मराठी संकेत स्थळांच्या निर्मितीसाठी इ. स. २००० पासून सर्व फँत पद्ध्तींचा वापर केला असून आता युनिकोडचा स्वीकार केला आहे. सध्या अस्तित्वात अस णार्‍यासंकेतस्थळांचे युनिकोडमध्ये रूपांतर करण्याचे काम चालू असून मायमराठी (www.mymarathi.com) हे संकेतस्थळ युनिकोडमध्ये रुपांतरीत केले आहे. सर्व साहित्यिकांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास त्यांचे साहित्य अत्यंत कमी खर्चात सार्‍याजगात प्रसिद्ध करता येईल. हा विचार सर्वांपर्यंत पोचावा यासाठी ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची साहित्यसागर सांगली हे संकेतस्थळ युनिकोड मराठी फॉट वापरून संकल्पित केले आहे. सद्यस्थितीस उपलब्ध असणारी अपार मराठी साहित्य संपदा युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याचे ठरविले तर जगाच्या ज्ञानकोशात मोलाची भर पडेल. महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यासाठी रोजगार हमीसारखी योजना काढली तर सध्या बेरोजगार असणार्‍या सुशिक्षित मराठी युवकांना काम मिळेल. शिक्षणक्षेत्रास याचा फार उपयोग होईल.याशिवाय सर्व विषयांवरील ज्ञान मराठीतून इंटरनेटद्वारे उपलब्ध झाले तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होण्यास वेळ लागणार नाही.

Monday, October 22, 2007

वर्ल्ड लायब्ररियन्स डॉट कॉम


प्राचीन काळापासून मानवी संस्कृतीत ग्रंथालयांना फार महत्व आहे. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडार. विविध विषयात माणसाने केलेली प्रगती व मिळविलेले ज्ञान यांचा एकत्र संचय ग्रंथालयात पहावयास मिळतो. या ग्रंथालयांची व्यवस्था पाहणारा ग्रंथपाल आवश्यक तो संदर्भग्रंथ देऊन प्रत्येक वाचकाची जिज्ञासा पूर्ण करतो. त्याला ग्रंथालयातील सर्व ज्ञानभांडाराची माहिती असते. सध्याच्या माहितीतंत्रज्ञानयुगात ग्रंथालयांचे महत्व अधिकच वाढले आहे. पुस्तकांशिवाय इतर अनेक नवीन माध्यमे ग्रंथकाराला हाताळावी लागतात. ग्रंथालयांना भरपूर अर्थसाहाय्य मिळत असले तरी ग्रंथपालाकडे बहुधा दुर्लक्षच केले जाते. या ग्रंथपालांना आधुनिक साधनांचा वापर सातत्याने करता यावा, त्यांचे संघटन व्हावे या दृष्टीकोनातून ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
ग्रंथपाल हा सतत पुस्तकांच्या संपर्कात असल्याने ते ते विषय व त्या अनुषंगाने उपलब्ध असणारी पुस्तके याचे समीकरण त्याचा मनात सतत मांडलेले असते. विविधविषयांवरील नवीजुनी पुस्तके, मासिके, वार्तापत्रे, ध्वनिफीती, चित्रफीती यांची आकर्षक पद्धतीने मांडणी करून तो वाचकाला सर्व प्रकारची माहती पुरविण्यात सदैव तत्पर असतो. अशा ग्रंथपालांना एकमेकांची माहिती व्हावी, त्यांच्या माहितीची देवाणघेवाण करता यावी या हेतूने ही साईट तयार करण्यात आली आहे. यात ग्रंथपालाची स्वत:ची माहिती, फोटो घालण्याची सोय केलेली आहे. जगभरातील सर्व ग्रंथपालांच्या माहितीसोबत वेगवेगळया प्रकाशनसंस्था, प्रकाशक यांचाही संग्रह वा साईटमध्ये केलेला आहे.

मधुरंग डॉट कॉम


मधुरंग वधुवर सूचक मंडळ या सांगलीतील संस्थेची ही वेबसाईट असून श्री. शामराव भिडे त्याचे प्रवर्तक आहेत. सर्व जातीधर्माच्या वधुवरांची नोंदणी या वेबसाईटवर करता येते. सर्व उपलब्ध स्थळांची फोटोसहीत माहिती ह्या वेबसाईटवर ठेवण्यात आली असून नोंदणीकृत सभासदांना ती पाहता येते. संस्थेच्या ऑफिसात व मेळाव्यात नोंदणी करता येत असून विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने विविध प्रकारचे रिपोर्ट तयार तयार करता येतात. वेबसाईट व सॉफ्टवेअरच्या वापरामुळे इच्छुक वधुवरांना आवश्यक ती सर्व माहिती कोठेही पाहता येते.

इ गुजर डॉट कॉम

मराठी भाषिक गुजर समाजाच्या उन्नतीसाठी बंगलोरमधील काही तरुणांनी पुढाकार घेऊन ही वेबसाईट कार्यांन्वित केली आहे. त्यात व्यवसाय मार्गदर्शन, वधुवर माहिती, भारतातील प्रमुख हॉस्पिटलचे पत्ते, मैत्री,परस्पर सहकार्य आणि आपल्या आवडीच्या विषयावर इतरांची मते जाणून घेण्यासाठी सूचनाफलक अशा अनेक सेवा सुविधा आहेत मात्र यातील काही सुविधांचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी करावी लागते. देशात व परदेशात राहणाऱ्या गुजर बांधवांपर्यंत गुजर समाजाची वैशिष्ठ्ये, रीतीरिवाज व इतर सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. 

घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे.

 त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. 

आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्युअल छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर टेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष भेटीसारखे सर्वार्थाने ज्ञान होऊ शकते. 

वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते फार सोयीचे ठरते. क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. 

इंजिनिअरिंग वा बांधकामविषयक उद्योगात मोठी ड्नॅइंग पाठवावी लागतात. नेहमीच्या इमेलने ती पाठविता येत नाहीत. साध्या वेबसाईटवरूनही ती लवकर घेता येत नाहीत. अशावेळी वेबसाईटवर आवश्यक तेवढी जागा राखून ठेवून व एफटीपी प्रणालीचा वापर करून ही गोष्ट साधता येते.

विज्ञान डॉट नेट


इंटरनेट ही आधुनिक काळातील विज्ञानाची सर्वात मोठी भेट आहे कारण इंटरनेटने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. मराठीतून विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसार यासाठी मात्र इंटरनेटचा वापर झालेला दिसत नाही. सर्व मराठी विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेवून ह्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाईटवर २०० वर शास्त्रज्ञांची विषयवार फोटोसहीत माहिती, विज्ञानविषयक पुस्तकांची सूची, शोध, विज्ञानलेख,तारकासमूहांची छायाचित्रे, विज्ञानजिज्ञासा, विज्ञान प्रसारक व्यक्ती आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे. लवकरच यात विज्ञानप्रयोग आणि चलत्चित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत व ग्रामीण भागातही विज्ञानप्रसार करण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सर्व विज्ञान शिक्षकांनी व विज्ञानप्रसारकांनी या व्यासपीठाचा विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी वापर करावा अशी अपेक्षा आहे.

संस्कृतदीपिका डॉट ओआरजी


संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. त्यामुळे कोणत्याही भारतीय भाषेचा अभ्यास करताना संस्कृतचा अभ्यास अनिवार्य ठरतो. याशिवाय संस्कृत साहित्यात सर्व विषयांवरील ज्ञानाचे अपार भांडार आहे. भारतीय संस्कृतीचा पायाही हे साहित्यच आहे. यामुळे शालेय स्तरावर संस्कृत विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र संस्कृत शिकविण्यासाठी चांगले शिक्षक मिळत नाहीत. संस्कृत पुस्तकांत फक्त काही उदाहरणे दिलेली असतात. त्यांचा उपयोग करून आवश्यक ती विभक्ती वा धातुरूपे विद्यार्थ्यांना करता येत नाहीत. संस्कृत शब्दांचा अर्थ लावणे, संधी, समास सोडविणे तसेच मराठीतून संस्कृतमध्ये भाषांतर करणे हेही त्यांना अवघड जाते. या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्यासाठी शब्दकोश तसेच व्याकरण व भाषांतराची उदाहरणे उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षे अथक प्रयत्न करून ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. यात ६००० वर संस्कृत शब्दांचे अक्षरक्रमाप्रमाणे व विषयवार इंग्रजी व मराठीत अर्थ दिले असून संस्कृत, इंग्रजी व मराठी अशा कोणत्याही भाषेतील शब्दाचे अन्य दोन भाषांत अर्थ मिळविता येतात. आठशे वाक्यांसाठी हीच सोय केली आहे. दोनशेवर संस्कृत सुभाषितांचे मराठी अर्थ दिल्यामुळे ही सुभाषिते कळणे व पाठ करणे मुलांना सोपे जाईल. नेहमीच्या वापरातील नामांची व सर्वनामांची विभक्तीरूपे, ४००वर धातूंची सर्व रूपे, ८०० संधी, ८०० समास, समानार्थी व विरूद्धांर्थी शब्द, अव्यये तसेच संपूर्ण व्याकरणाचा या वेबसाईटवर समावेश करण्यात आला आहे. आता संस्कृत शब्दांचे उच्चार कसे करावेत हे समजण्यासाठी ध्वनीफितीद्वारे आवाजाचीही जोड यास देण्यात येणार आहे.

माय कोल्हापूर डॉट नेट


प्राचीन काळापासून कोल्हापूरचा इतिहास, कोल्हापूरची वैशिष्ठ्ये, शहरातील तसेच कोल्हापूर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, किल्ले, तीर्थक्षेत्रे यांची सचित्र माहिती या वेबसाईटवर आहे. सर्व महत्त्वाचे फोन व संपर्क पत्ते यात आहेतच शिवाय फोटोगॅलरी, विनोद, सिनेमा यासारखी मनोरंजनपर माहिती व वधू वर सूचक माहिती, हवामान, सोन्या चांदीचे भाव इत्यादी अनेक आवश्यक माहिती यात आहे. नुकत्याच घडून गेलेल्या प्रलयंकारी महापूराचे रौद्ररूप दर्शविणाऱ्या छायाचित्रांचा संग्रहही या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या वेबसाईटचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कोल्हापूरचा नकाशा. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा माहिती पूर्ण नकाशा तयार केला असून यात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती तसेच त्याचे स्थान पाहता येते. या नकाशावर व्यावसायिकांना आपली जाहिरात करण्याची सोय केल्यामुळे व्यवसायाचे स्थान, पत्ता व माहिती ग्राहकास पाहता येणार आहे. अशी सुविधा भारतातील फारच थोड्या वेबसाईटवर पहावयास मिळते. या अभिनव वेबसाईटवर आपली जाहिरात करून सर्व जगभर आपल्या मालाची व व्यवसायाची माहिती देण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे.

Wednesday, October 17, 2007

माय मराठी


मानवी जीवनाचा साहित्य व संस्कृती हा महत्वाचा वारसा आहे व भाषा त्यासाठी अत्यावश्यक माध्यम आहे. महाराष्ट्रीयनांसाठी तर मराठी भाषा ही जीवापाड जपण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भोवतालची परिस्थिती व नेहमीच्या व्यवहारासाठी लागणारी स्थानिक भाषा यामुळे यात अनेक अडचणी येतात. आपल्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृती टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुलांना मराठी शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा, पुस्तके वा शिक्षक नसतात. मराठी मासिके व पुस्तकेही मिळत नाहीत. घरातही मराठीऎवजी दुसरी भाषा वापरण्याची सवय लागते व हळू हळू मराठीपासून मुले दूर होऊ लागतात. त्यांचा मराठी संस्कृतीशी असणारा संपर्क तुटत जातो. पालकांनी मराठी बोलण्याचा कटक्ष ठेवला तर मुलांना मराठी समजते थोडे बोलताही येऊ लागते. मात्र वाचणे वा लिहिणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा मुलांसाठी प्रभावी दृकश्राव्य माध्यमाची गरज आहे. परप्रांतांत वा परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांकडे जाणाऱ्या व नेहमी मराठी मासिके व पुस्तके वाचणाऱ्या मराठी मंडळींना मोजक्या मराठी वृत्तपत्रांचे अंक इंटरनेटवर वाचून त्यावर समाधान मानावे लागते. वेबसाईट हे माध्यम साहित्य प्रसार व उपलब्धतेसाठी वापरणे हा यावर उपाय ठरू शकतो. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांची ही गरज भागविण्याच्या हेतूने माय मराठी वेबसाईटची कल्पना सुचली.
याच अनुषंगाने पुण्यात भरलेल्या ७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटद्वारे अभिजात मराठी साहित्याची ओळख करुन देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानदीपने हाती घेतला. पुढे साहित्याबरोबरच मराठी रीतीरिवाज, सण, परंपरा तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे यांच्याही माहितीचा यात समावेश करण्यात आला. इंटरनेटवर मराठी लिहिता यावे यासाठी प्रथम शिवाजी हा फॉंट, नंतर सीडॅकचा योगेश, मोड्युलरचा श्रीलिपी फॉंट वापरून वेबसाईट तयार करण्यात आली. मात्र वाचकांना मराठी फॉंट आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावा लागे. डायनॅमिक श्रीलिपी फॉंट मिळाल्यावर ही वेबसाईट सर्वांना विनासायास पाहणे शक्य झाले. मात्र तरीही गुगलसारख्या शोधयंत्रास ही मराठी अक्षरे समजत नसल्याने या वेब साईटची माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचू शकत नव्हती.
अगदी अलिकडच्या काळांत मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज आणि इंटरनेट एक्स्प्लोअरमध्ये युनिकोड मराठी फॉंट वाचण्याची सोय उपलब्ध केली. युनिकोड मराठी फॉंट वापरून नव्या वेबसाईटही इंटरनेटवर आल्या. ओंकार जोशी यांनी गमभन नावाचा ब्राउजरमध्ये मराठी लिहिण्याचा प्रोग्राम विकसित केला व सर्वांना मोफत ऊपलब्ध करून दिला. बराहा डॉट कॉम या वेबसाईटनेही बराहा नावाचा युनिकोड मराठी फॉंट डाऊनलोडसाठी दिला. गुगल व रेडीफने इंटरनेटवर मराठी मेल लिहिण्याची सोय उपलब्ध केली. या पार्श्वभूमीवर ज्ञानदीपने माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटचे युनिकोड मराठी फॉंटवर आधारित मायमराठीडॉटकॉम मध्ये रूपांतर करण्याचे ठरविले आणि एका महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण केले. आता डायनॅमिक श्रीलिपी फॉंट आणि युनिकोड मराठी फॉंटमध्ये माहिती वाचण्याचा पर्याय ज्ञानदीपने मराठी वाचकांना दिला आहे. तसेच वेबसाईटवर मराठी अभिप्राय देण्याची सुविधा निर्माण केली आहे.
जानेवारी २००७ मध्ये सांगलीत भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व माहिती देणे तसेच त्यावेळेपर्यंत मायमराठीडॉटकॉम या वेबसाईटचा विस्तार करून मराठी लिहिण्या-वाचण्यास शिकण्याची सोय, महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीबरोबरच भौगोलिक, सामाजिक, आर्थिक या व अशा इतर क्षेत्रांतील माहितीचा समावेश करणे हा उद्देश ज्ञानदीपने बाळगला आहे. माहिती तंत्रज्ञान हे मराठी भाषेसाठी नवे वरदान आहे. त्याचा उपयोग करून म्रराठी भाषा व संस्कृती अधिक समृद्ध, बळकट व सर्वव्यापी करण्याची सुसंधी आपल्याला लाभलेली आहे. सर्वांच्या सक्रीय सहकार्याने यात यश येईल असा विश्वास वाटतो.

Tuesday, October 16, 2007

शिक्षणाचे माध्यम - मराठी का इंग्रजी

महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे सारे जग एक झाले आहे. या स्पर्धेच्या युगात मराठी माणूस मागे पडू नये व नव्या आव्हानांना सामोरे जाणे नव्या पिढीला शक्य व्हावे या दृष्टीने सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. मुले नवी भाषा लगेच सहजपणे शिकू शकतात व लहानपणी शिकलेले चांगले लक्षात रहाते या गोष्टींचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असे वाटते. कदाचित चौथीनंतर बरीच मुले शाळा सोडतात त्यासाठी त्यांनाही इंग्रजीची तोंडओळख असावी अशीही त्यामागे कल्पना असावी.

यावेळी हे लक्षात घ्यावयास हवे की या धोरणाचा दृश्य परिणाम दिसायला किमान पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे. तसेच याचा आपल्या सांस्कृतिक जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. गरीब शेतमजूर, झोपडपट्टीत हलाखीत जीवन कंठणारे लोक आपली मुले ` पप्पा मम्मी ` म्हणतात आणि इंगजी गाणी गातात म्हणून निश्चितच खूष होतील पण मुलेच मानसिकदृष्ट्या त्यांचेपासून व इंग्रजी न जाणणाऱ्या इतर बालमित्रांपासून मानसिकद्दृष्ट्या दूर होण्याची भीती आहे.

आपण याआधीच परिसरविज्ञानासारख्या आवश्यक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मुलांवर अभ्यासाचा जास्त बोजा पडला तर त्याचाही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे इंग्रजी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिल्यास मुलांचे मराठी कच्चे राहण्याचा धोका जास्त जाणवतो. इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना इतर विषय चटकन् समजत नाहीत व ती मुले बऱ्याच वेळा सामान्य ज्ञानात मागे पडतात असा अनुभव आहे. पुष्कळदा महत्वाकांक्षी गरीब पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मात्र सधन व सुशिक्षित पालकांसारख्या सुविधा व लक्ष देऊ न शकल्याने त्यांच्या पदरी निराशा येते व मुलांनाही ते न पेलवणारे ओझे ठरते.

यामुळे इंग्रजीच्या हव्यासापायी मराठीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. समाजाची इंग्रजीबाबत असणारी उदासीनता ही मागासलेपणाचे लक्षण न मानता त्यात व्यावहारिक अडचण आहे हे समजून घेतले पाहिजे.परक्या भाषेत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य असले तरी सर्वसामान्य माणसास तशी इच्छा, सवड व क्षमताही नसते. त्यामुळे मातृभाषेत उपलब्ध असणाऱ्या ज्ञानावरच तो आपले काम भागवतो.

याउलट संगणक क्रांतीकडे पाठ फिरवूनही चालणार नाही. संगणकाचे फायदे त्वरीत मिळण्यासाठी तातडीने उपाय करणे आवश्क आहे यात शंका नाही. यासाठी इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न संगणक तज्ञांनी करावयास हवा. सध्या संगणक क्षेत्रात समाजातील उच्चशिक्षित बुद्धीमान वर्ग प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांना मराठीसाठी नव्या संगणक प्रणाली विकसित करणे सहज शक्य आहे.

मात्र मराठीबाबत त्यांचा दृष्टीकोन सहसा नकारात्मक असतो. मराठीतून काम करणे म्हणजे कमीपणाचे अशी त्यांची समजूत असते. मात्र आजच्या काळाची ती गरज आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे. सध्या संगणक शिक्षणाचे सगळीकडे पेव फुटले आहे. गल्लोगल्ली निघालेल्या अशा शिक्षणसंस्थांत लाखो मुले, नोकरी मिळेल या आशेने महागडी फी भरून शिक्षण घेत आहेत. मात्र या सर्वांना देण्यासाठी आपल्याकडे नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या देऊ शकणारे उद्योग परदेशी मालाच्या आक्रमणाने याआधीच आर्थिक मंदीत आहेत. अशावेळी मराठीतून संगणक प्रणाली विकसित करण्याचा व्यवसाय स्वयंरोजगार निर्मितीसाठी एक आशेचा किरण आहे.

मराठीस माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिल्याने मराठी की माहिती तंत्रज्ञान असा वाद मध्यंतरी निर्माण झाला होता. मात्र मराठीस माहिती तंत्रज्ञानाने नवी संजीवनी मिळाली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. युनिकोड वा डायनॅमिक (स्वयंचलित) फॉंटचा वापर करुन इंटरनेटवरून मराठी साहित्य सर्व जगभर कोणासही उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

Monday, October 15, 2007

GREEN CITY


Today the growing cities are facing many problems either due to improper planning, lack of strict implementation of rules or paucity of funds to build infrastructural facilities leading the urban life to insecure, unhealthy and full of hardship. Every citizen thinks that some day his city would become livable, eco friendly and lovable. But his dreams seem to be fast disappearing. As engineers, architects and administrators can we do something which will convert that dream into concrete reality?
It is necessary that civic authorities of all municipalities to take part in this workshop and present their problems and methodology of solution they have adopted. As the topic deals with urban environment, experts from various fields like environment, town planning, architecture, engineering and finance need to contribute in tackling this complex problem. People action groups and NGOs should create pressure for speedy implementation of development plans and financial institutions should come forward to support them.

GREEN CITY PORTAL
A portal website www.greencityportal.com is launched by the foundation for focusing environmental issues in city planning and for promotion of architects and builders of green real estates. It would include all aspects of green city planning and assist civil administration in integrated environmental management. The website shall display advertisements of green products and technologies. Architects and builders can display their company profile and projects. It will also provide a platform for all concerned agencies to share articles, views and other information with experts, civic authorities and the general public.

Riddle of Family Tree Database

Design of effective and normalized database for family tree is a test for good designer. Though one family generations can be described and represented quite satisfactorily by sticking to family name ( surname in Indian context), it stops to explain and register linkages with other families at every node of marriage.

Though each person, he or she, has a father and mother, the relatives are spread in both families. In the Indian context there are variety of names for each relation and to prepare a complete database even for one person is complex. On the other had the basic relations are simple Father, Mother, Brothers, Sisters, Husband / Wife, Sons and Daughters which can be expressed in the form of as one to one or one to many relationships.

Family database could be plotted by interconnections with similar sets of each person in the family. Assigning relation names is a difficult task. Divorce, remarriages complicate the issue further.

Yet everybody wants to know about his ancestors, the family tree is understood by all, forms base of history, categorizes population in different groups. The perfect simple database design reducing redundancy is a challenge before those designing family histories and linkages for Indian matrimony software developers with display of complex relationships from database.

इंटरनेटवर कुलवृत्तांत


भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाचा मुख्य आधार आहे. वंशपरंपरा व नातेसंबंध यांची माहिती एकत्रितपणे सुसंगतपणे
मांडणे म्हणजे कुलवृत्तांत. अनेक वर्षे अथक प्रयत्न करून, निरनिराळया ठिकाणी राहणाऱ्या कुलबंधूंची अधिकृत माहिती जमा करणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे वंशावळीचा व घराण्यांचा इतिहास लिहिण्याचे फार मोठे कार्य अनेकांनी केले आहे. आजच्या धकाधकीच्या युगात असे कार्य करणे अशक्यप्राय झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान असतो आपल्या पूर्वजांबद्दल आदरयुक्त प्रेम असते. कुलदैवतावर श्रद्धा असते. आपल्या
पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. घराण्यातील रीतीरिवाज, सणवार यांची माहिती पूर्वी एकत्र कुटूंबपद्धतीत
विनासायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायची. आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, शिक्षण व नोकरीसाठी राहण्याचे स्थान
बदल्याने अशी माहिती मिळण्यास अडचणी येतात. कुलवृत्तांत ही सर्व माहिती असते. मात्र असे कुलवृत्तांत फारच थोड्या घराण्यात तयार झाले आहेत. आणि ते तयार झाल्यावर काळ लोटला की त्यातील माहितीने नूतनीकरण न झाल्याने त्याचा फक्त ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग शिल्लक रहायचा.

सध्याच्या संगणक युगात वेबसाईटवरून नित्य नूतनीकरणाची सोय उपलब्ध असल्याने अद्ययावत कुलवृत्तांत केव्हाही कोणासही कोठेही पाहता येणे शक्य झाले आहे. या सुविधेचा वापर करताना फक्त आवश्यक तेवढ्याच माहितीचा कोश तयार झाला तर तो जास्त उपयुक्त ठरेल. नातेसंबंधांची माहिती उपयुक्त असली तरी त्याचा फारच थोड्या लोकांशी असल्याने तसेच त्यात अनेक प्रकारच्या माहितीचा व घराण्याचा संबंध येत असल्याने त्याचा समावेश करणे योग्य ठरणार नाही.

आतापर्यंत अनेक घराण्यांनी आपले कुलवृत्तांत तयार केले आहेत. मात्र सर्व जाती-धर्मांच्या लोकांत हे काम अजून झालेले नाही. कुलवृत्तांत डॉट कॉम ही वेबसाईट त्यासाठी तयार करण्यात आली असून रानडे डॉट कुलवृत्तांत डॉट कॉम हा विभाग सबडोमेन स्वरुपात नमुन्यादाखल तयार करण्यात येत आहे. या विभागात त्या घराण्याची तसेच मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल इ. माहिती देता येईल. आमच्या मते कुलवृत्तांतात खालील माहिती असावी -
कुलदैवत, कुळाचार, संक्षिप्त इतिहास, मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल.


युनिकोड मराठीचा वापर केल्यास फ्लॅश वा डायनॅमिक फॉंट न वापरता मराठीतून आपली माहिती लिहिणे आता शक्य असल्याने कुलवृत्तांत आता मराठीत लिहिता येईल. पुरेसा प्रतिसाद मिळाला तर या वेबसाईटवर इतर अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. उदा. व्यवसाय जाहिरात व मार्गदर्शन, वधू-वर मंच इ.

माहिती अधिकृत होण्यासाठी तसेच त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून लॉग-इन व्यवस्था तयार करून त्याचे संचालन प्रत्येक घराण्याच्या प्रायोजकाकडे दिले जाईल. आपल्याकडून यास योग्य प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. ही वेबसाईट अधिक उपयुक्त ठरण्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास त्या जरूर कळवाव्यात. तसेच आपल्या घराण्यासाठी स्वतंत्र विभाग करावयाचा असल्यास इच्छुक प्रायोजकांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा. ही विनंती.

Saturday, October 13, 2007

वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट

साहित्याप्रमाणेच कला हा माणसाच्या सृजनशीलतेचा एक सुंदर आविष्कार आहे. जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या कलेचे उपासक एखाद्या व्रतस्थासारखे कलानिर्मितीत व्यग्र असतात. चित्रकला ही अशीच एक कला आहे. भारतात प्राचीन काळापासून चित्रकलेला फार महत्व दिले गेले होते. आजही भारताच्या कानाकोपऱ्यात असंख्य चित्रकार आहेत. मात्र त्यांच्या कलेला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळू शकत नाही.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रांच्या प्रतिकृती करण्याचे तंत्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे. त्यामुळे चित्रकला हा व्यवसाय हळूहळू लोप पावत आहे. मात्र याचवेळी भारतातील काही मोजक्याच चित्रकारांची चित्रे लाखो नव्हे; तर कित्येक कोटी रुपयांना विकली जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमांची जोड मिळाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इतर सर्व चित्रकारांना त्याच्या कलेच्या प्रदर्शनासाठी जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट ही वेबसाईट तयार केली आहे.

कोणतेही मोठे चित्र काढण्यासाठी बराच खर्च येतो. चित्र काढण्याच्या माध्यमामध्ये आता अनेक नवीन प्रकार रूढ झाले आहेत. पेन्सिल स्केचिंग, पावडर शेडिंग, वॉटर कलर (जलरंग), ऑईल पेंट, नाईफ पेंटिंग, कोलाज (कागदाचे तुकडे जोडून केलेले चित्र) इत्यादी.

पूर्वी निसर्गाचे वा व्यक्तीचे दिसते तसे हुबेहूब चित्र काढण्याला फार महत्व दिले जाई. निसर्गाच्या रंगातील सूक्ष्म छटा, छाया-प्रकाशामुळे त्यांच्यात होणारे फरक, तलम वस्त्रामागील शरीराचे यथायोग्य दर्शन, दिव्याच्या प्रकाशाचा भोवतालच्या वस्तूंवर होणारा परिणाम, हलत्या वस्तूतील गतिमानता, डोळयातील चमक, चेहऱ्यावरील भाव दाखविण्यात चित्रकाराचे कसब पणाला लागते. फोटोग्राफीच्या तंत्रामुळे या कलाप्रकाराला मोठ्ठा धक्का बसला. फोटोत निसर्गाचे वा व्यक्तीचे हुबेहूब चित्र विनासायास निघत असल्याने व आधुनिक तंत्राचा वापर करून त्यात छाया-प्रकाशांचा प्रभाव दाखविता येत असल्याने हुबेहूब चित्रांची गरज कमी झाली. पूर्वी सधन लोक चित्रकारांकडून आपली चित्रे काढून घेत व त्यावर चित्रकारांचा उदरनिर्वाह चाले.

जाहिरातीसाठी चित्रे काढणे या व्यवसायाचा चित्रकारांना बराच काळ आधार होता. सिनेमा पोस्टर्स व मोठ्या जाहिराती, मासिकातील चित्रे काढणे, भेटकार्डे तयार करणे हे बऱ्याच चित्रकारांचे व्यवसायाचे मुख्य साधन होते. आता सिनेमा पोस्टर्स वा बॅनर जाहिराती डिजिटल पोस्टर स्वरूपात अगदी कमी खर्चात व थोड्या वेळात तयार करता येतात. मासिकातील चित्रेही संगणकावर कोणासही सहज तयार करता येतात. साहजिकच ही कला केवळ काही प्रायोजक व्यक्ती वा संस्था यांच्या सहकार्यावर तग धरून आहे.

मुंबई, बंगलोरसारख्या मोठ्या शहरात असणाऱ्या कलादालनात प्रदर्शन भरविल्यास मोठ्या कंपन्यांकडून अशी चित्रे विकत घेतली जातात. मध्यंतरी कोल्हापूरच्या शेलार या चित्रकाराची लाखांची चित्रे विकली गेली. चित्रकला ही सर्वांनाच आवडणारी कला असल्याने चित्रकला शिकविण्याचे कामही तितकेच महत्वाचे आहे. सांगलीतील श्री. पतंगे या पावडरशेडिंगमधील तज्ञ चित्रकाराने आर्ट सर्कल स्थापून ही कला शिकविण्याचे कार्य सुरू केले आहे व त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे.

वडगावचे नाईकवडी यांच्या चित्रांना मुंबई प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांचे एक चित्र ५०००० रुपयांना विकले गेले. बी.बी.सी.ने त्यांच्या चित्रकलेविषयी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी श्री. नाईकवडी यांचे स्टुडिओमध्ये चित्र काढतानाचे शूटिंग केले आहे.

Monday, October 8, 2007

इंटरनेट

प्रस्तावना :-

आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.

हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट`

इतिहास :-

१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला. नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि 'इंटरनेट` चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्कमध्ये रूपांतरीत झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे.

इरनेट (ernet) :-

भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे. इरनेटचा उपयोग फक्त शिक्षण व संशोधन संस्थांना करता येतो.

व्ही.एस.एन.एल. (विदेश संचार निगम लि.) ने १९९४ मध्ये इंटरनेटसाठी निविदा मागविल्या. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने परदेशी निविदा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. `कॉम्प्युसर्व्ह' नावावर अमेरिकेतील एका कंपनीने इंटरनेटची सेवा देणे सुरू केले. आता भारतातील कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ लागले आहे. व्ही.एस.एन.एल.ने स्वतंत्रपणे अशी सेवा (इंटरनेट अक्सेस सर्व्हीस) देणे सुरू केले.
व्ही.एस.एन.एल.चे मुख्य केंद्र मुंबई असून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर व पुणे ही भारतातील शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडण्यात आली आहेत. इतरही शहरे हळुहळु या नेटवर्कला जोडली जाणार आहेत.

वापर पध्दती :-

इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी संगणक, फोन याशिवाय त्या दोघांना जोडणारे मॉडेम नांवाचे उपकरण लागते. मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

इंटरनेट वरून तुम्हाला समजा माहिती पाठवायची असेल तर जेथे ती पाठवायची त्याचा सांकेतिक क्रमांक देऊन ती पाठवावी लागते. ही माहिती जशीच्या तशी न जाता आधी त्याचे छोट्या भागांत (पॅकेज) रूपांतर केले जाते हे भाग कमी जास्त लांबीचे असू शकतात. हे भाग रूटर नावाच्या विशिष्ट संगणकाव्दारे एका नेट वरून दुसऱ्या नेटवर असे करत योग्य पत्त्यावर पाठविले जातात. (जणू काही वेगवेगळया बॅगांमधून पाठविलेले सामान) ज्या ज्या ठिकाणाहून भाग घेतले वा पाठविले जातात तेथे अनेक मार्गांनी माहितीची पाकिटे येत असतात. ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी देखील अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे व वेळ कमी लागेल याचा विचार करून प्रत्येक पॅकेज पाठविले जाते. हे सर्व अतिशय वेगात चालत असल्याने वेगवेगळया मार्गाने प्रवास करूनही हे भाग अत्यल्प वेळात मुक्कामी पोचतात. त्याचवेळी इतर ठिकाणहून माहिती येत असल्यास त्याचा क्रम लावला जातो. व पोस्ट बॉक्ससारखी त्या संगणाकावर सर्व माहिती साठवून ठेवली जाते. म्हणजे रोज कामाला सुरूवात करण्यापूर्वी कोणाकोणाची पत्रे आली आहेत ते ही पोस्ट बॉक्स उघडून पाहता येते. ज्या ठिाकणी माहिती जावयाची तेथे दुसरे काम चालू असल्यास मध्येच तातडीची खिडकी पडद्यावर येऊन माहिती आल्याची

सूचनाही दिली जाऊ शकते.

इंटरनेट व फॅक्स :-

इंटरनेटवरील इ मेल (इलेक्ट्नॅनिक मेल) आणि फॅक्स यांची तुलना केली. फॅकस कमी वेळात नियोजित स्थळी पाठविता येतो. इ मेल नेटवर्कवरील रहदारीवर अवलंबून असल्याने त्यास वेळ लागू शकतो. मात्र फॅक्ससाठी बराच खर्च येतो. एक पान माहितीसाठी भारतातल्या ठिकाणी १० रूपये तर अमेरिकेतील ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च येतो. इ मेलसाठी फक्त फोनचा खर्च येत असल्याने तो नाममात्र असतो. फॅक्स ज्याला पाठवायचा त्यालाच तो मिळाला का दुसऱ्याने घेतला व फॅक्सचे ुत्तर त्याने परत फॅक्स केला तरच मिळू शकते. इ मेल मात्र योग्य त्या माणसाच्या सांकेतिक क्रमांकावर जात असल्याने त्याच्याशिवाय दुसऱ्याला मिळत नाही. तो मिळाला की नाही ते लगेच कळू शकते व थोड्याच वेळात त्याचे उत्तरही आपल्या संगणकावर मिळू शकते. आपण फॅक्स पाठविणार पाठविणार तो बाहेरगावी गेला असेल वा प्रवासात असेल तर त्याला फॅक्स मिळू ाकत नाही. इ मेलमध्ये पत्ता म्हणजे एक सांकेतिक क्रमांक असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

इ मेल :-

इंटरनेटवरून पाठविलेल्या माहितीवर गुप्तता ठेवणे कठीण असते. पुष्कळ वेळा इ मेलवरील माहितीवर नजर ठेवली जाते. अर्थात इंटरदेटवरून माहितीच्या देवाणघेवाणीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की असे लक्ष ठेवणे वा माहिती विना परवाना वापरणे या गोष्टी कठीण आहेत. तरीही खाजगी कंपन्याना इंटरनेटव्दारे आपली माहिती बाहेर फुटण्याचा धोका वाटतो. यासाठी त्यांच्याकडे संरक्षक व्यवस्था ठेवणारे प्रोग्रॅम (फायरवॉल सारखे) वापरले जातात. पुष्कळ कंपन्या सर्व माहिती विशिष्ट सांकेतिक पध्दतीने बदलून इंटरनेटवर सोडतात. ज्यांना ती सांकेतिक लिपी माहीत असेल त्यांनाच त्याची उकल होऊ शकते. संरक्षण, गुन्हा अन्वेषण, संशोधन संस्था अशाप्रकारे इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करतात.

इंटरनेटवरील काही माहिती प्रचार वा प्रसारासाठीच असते. बातम्या, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, वस्तूंच्या किंमती, देखभाल व दुरूस्ती, शिक्षण. ग्राहक सेवा, पर्यावरण संरक्षण इत्यादी अनेक प्रकारची माहिती कोणासही सहजपणे विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था इंटरनेटवर करण्यात आलेली असल्याने शिक्षण, व्यापार, संस्कृती, राजकारण यांच्या प्रसारास 'इंटरनेट ` हे महत्वाचे साधन झाले आहे. शिवाय इंटरनेट ही कोणा एकाची मालमत्ता नाही. जो कोणी इंटरनेटशी आपला संगणक जोडेल त्याचा तो हक्कदार होतो.

इंटरनेटवर खालील सेवा पुरविल्या जातात :-

१) इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो.
२) जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात.
३) आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करून घेऊ शकता.
४) जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो.
५) करमणुकीसाठी नवीन साधने उपलब्ध होतात.

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे ही शक्यता आता दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत एका देशातील बुध्दीमत्ता तेथील इतर परिस्थिती योग्य नसल्याने त्या देशास वापरता येत नव्हती. त्यामुळे बुध्दीमान लोक प्रगत राष्ट्नत जाऊन बुध्दीमत्तेच्या साठ्यास गळती लागून (ब्रेन ड्न्ेन) प्रगतशील राष्ट्नना नव्या धोक्याला सामोरे जावे लागत होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्नत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुले खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो. टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते. सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.

बी.बी.एस्. (बुलेटीन बोर्ड सिस्टीम) कंपन्या माहिती साठवून ठेवणे व वितरीत करणे या पध्दतीने काम करतात. या ठिकाणी आपण केव्हाही माहिती पाठवूश शकतो. घेणाऱ्याचा संगणक चालू नसला तरी अशा कंपन्यांच्या सहाय्याने ही माहिती पाठविता येते.

वर्ल्ड वाइड वेब (www) या सर्वांना वाचता येऊ शकेल असे पान (साईट) अनेक कारणांसाठी कंपन्या तयार करतात. त्यांना एक विशिष्ट संकेतक्रमांक मिळतो. यालाच संकेतस्थळाच्या नावाने ओळखता येते. छोट्या कंपन्या अशा पानाचा छोटा हिस्साही आरक्षित करू शकतात. या पानावर वर्णनात्मक वा चित्रमय माहिती असते. वर्णनात्मक माहितीतून आवश्यक ते शब्द पकडून वाचकास त्या शब्दाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकते. अशा वर्णनाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) असे म्हणतात.

गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.

इंटरनेटवर वेगवेगळया प्रकारचे संगणक जोडले जाण्याची किमया व त्यात संपर्क साधण्याची शक्यता टी.सी.पी./आय.पी. (ट्नन्स्मिशन कंट्नेल प्रोटोकोल/इंटरनेट प्रोटोकोल या नियम प्रणालींचा वापर केल्याने प्रत्यक्षात आली आहे. इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक सुलभ व प्रभावीपणे करता येणार आहे.

इ मेल हा इंटरनेटचा प्राथमिक उद्देश वाटला तरी प्रत्यक्षात वापर करमणुकीसाठी खेळ, चित्रपट आणि संगीत यांच्या आदान प्रदानासाठी जास्त होत आहे.इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील राष्ट्नंना एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.

Wednesday, October 3, 2007

लिंक बदल

स्वप्न हरित नगरीचे, भविष्यातील वाहतुक समस्या आणि घन कचरा व्यवस्थापन या लेखांसाठी ग्रीनसिटीपोर्टल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या.

Friday, September 21, 2007

कळप

माणूस हा कळप करून राहणारा प्राणी आहे.जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, वसाहत, गाव, राज्य, देश म्हणजे जन्म, आचार, विचार, साहचर्य, स्थान, नोकरी, ध्येय, उद्योग यापरत्वे निर्माण झालेले माणसांचे कळपच आहेत. कळपाचे काही नियम असतात. काही फायदे असतात. एका कळपातील लोक स्वत:ला श्रेष्ठत्वाचा मान घेतात व इतर कळपांबाबत कनिष्ठता बाळगतात. हा एक आत्मप्रौढीचा सार्वत्रिक आविष्कार आहे.कळपाच्या चालीरीती त्याचे नियम बनतात. कळपाच्या बाहेर गेल्यास कळपातील लोक त्याचा तिरस्कार करतात. कळपातील पक्षी बाहेर पडल्यावर त्याला कळपातील पक्षीच चोचींनी घायाळ करतात तीच तऱ्हा माणसांच्या अशा कळपात होते. समाजातून बहिष्कृत होणे व त्यांचा रोष ओढवून घेणे इत्यादी धोक्यांना अशा माणसाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्वसाधारणत: माणसे कळपात राहणे पसंत करतात. कळपात राहिल्यास माणसास सुरक्षितता लाभते. एकटेपणाचे भय रहात नाही. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून माणूस कळपालाच स्वत:चे प्रतीक समजू लगतो. कळपातील माणसे कळपाचे नियम पाळतात एवढेच नव्हे तर कळपाच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तन, मन, धनही अर्पण करतात. म्हणजेच ती माणसे कळपाचा एक अविभाज्य अंग बनतात आणि तो कळपच एक स्वतंत्र प्राणी बनतो.कळप किती घट्ट विणीचा, किती चिवट आणि जाज्वल्य यावर त्याचे अस्तित्व वा वाढ अवलंबून असते. मात्र असा कळप शिरजोर झाला तर इतर कळपांवर आक्रमण करून स्वत: मोठा होण्याचा प्रयत्न करतो.यातून नवे प्रश्न निर्माण होतात. सर्व कळप एकाच प्रकारे विभागले नसल्याने एकच माणूस एकाच वेळी अनेक कळपांचा सदस्य असतो. या सर्व कळपांचे नियम पाळणे त्यात समरस होणे त्याला शक्य नसते. त्यामुळे त्याची ओढाताण होते. माणूस व कळप किंवा दोन कळप यात संघर्ष होतो.असा संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या कळपांसाठी आदर्श नियमावली केली जाते. पण तरीही कळपांवे एकमेकांशी संघर्ष चालू असतात. या संघर्षात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कळप आपली ताकत वाढविण्याचा प्रयत्न करतो वा अनेक छोटे कळप एकत्र येऊन मोठ्या कळपाचे रूप घेतात.एकंदरीत मानवी समाजव्यवस्था कळप करून राहणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणेच असते. त्यांच्या वर्तनात विलक्षण साम्य आढळते. समाजातील अनेक घटनांचा आणि मानसिक ताणतणावांचा कार्यकारणभाव शोधण्यासाठी मानवसमूहाची प्राण्याशी व अशा प्राण्यांच्या कळपातील संघर्षाशी तुलना करणे अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते.या संकल्पनेचा अधिक विस्तार केल्यास निसर्गातील पदार्थ हे देखील एकप्रकारचे कळपच असतात व ऊर्जा म्हणजे त्यांच्यातील संघर्षाचे दृष्य स्वरूप असते असे म्हणता येईल.

Friday, August 24, 2007

शालेय शिक्षणासाठी वेबसाईट

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शालेय शिक्षणासाठी अनेक नव्या संधी उपलव्ध झाल्या आहेत. आतापर्यंत शिक्षणाचे माध्यम पुस्तकी स्वरुपात होते व प्रत्यक्ष शिक्षण अनिवार्य होते. साहजिकच यासाठी पुस्तकांची वा शिक्षकांची कमतरता वा प्राविण्य या अडचणी शालेय शिक्षणापुढे होत्या. माहिती तंत्रज्ञान व दूरस्थ शिक्षणाच्या सोयीमुळे असे अनेक प्रश्न सहज सुटणार असून विचार व माहितीची देवघेव, शिक्षणातील सर्व घटकांचा सक्र ीय सहभाग आणि शिक्षणाचा दर्जा अत्युच्च राखणे शक्य होणार आहे.
शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत. जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता येत नाही. यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्क आहे.
एरवी अशक्य वाटणारे हे काम इंटरनेटच्या साहाय्याने अगदी सहजसाध्य झाले आहे. अनेक शाळा एकमेकांशी जोडणे, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी यांची एकसंध फळी निर्माण करणे, प्रत्येक पायरीवरील अभ्यासक्रमाचे संकलन करून त्यातील प्रभावी पद्धतीची निवड करणे शालेय शिक्षणाचे एक मध्यवर्ती आभासी केंद्र करून साध्य करता येतील. यालाच एर्वीलरींळेपरश्र झेीींरश्र असे म्हणतात.
अमेरिकेत अशा एर्वीलरींळेपरश्र झेीींरश्र चा वापर केला जातो व त्यातून अभ्यासक्रमातील सुधारणा, शिक्षकांना मार्गदर्शन तसेच आदर्श शिक्षणपाठ यांची माहिती सर्वांना उपलब्ध करून देता येते. सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाने फार मोठे कार्य होऊ शकते व पुनरुक्ती टळते. तसेच यासाठी खर्चही कमी येतो. यासाठी ज्ञानदीप सर्व शाळांचे एकत्रीकरण करणार आहे. आपली शाळा यात सहभागी झाली तर आपणास खालील फायदे मिळतील.
१. विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे माहिती संकलन व संपर्क व्यवस्थापन. २. शिक्षणासाठी आवश्यक संदर्भग्रंथ व साहित्य यांची सूची.३. आदर्श शिक्षणपाठ तयार करण्याची शिक्षकांना संधी तसेच विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून शंका समाधान करून घेण्याची सोय अशा वेबसाईटद्वारे करता येईल.४. पालकांच्या अडचणी व सूचना यांचे संकलन तसेच त्यावर उपाययोजना, मार्गदर्शन होऊ शकेल.५. निरनिराळया शाळांतील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना त्यांच्या आवडीनुसार आंतरशालेय गट करून विविध क्षेत्रांत कार्य वा संशोधन प्रकल्प करता येतील.६. संगणकाचा वापर केवळ करमणुकीसाठी न होता तो सर्वांशी संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून वापरण्याची सवय विद्यार्थी व शिक्षक यांना लावणे आवश्यक आहे.
यात प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र वेबपेज, सर्व शाळांचे पत्ते, आदर्श शिक्षणपाठ, शालेय स्तरावरील विविध विषय शिकविण्यासाठी अशाच वेबसाईट शालेय शिक्षकांच्या मदतीने तयार करण्याचा ज्ञानदीपचा मनोदय आहे.

मेंदू आणि संगणक

भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. जर यंत्रमानव विचार करू लागला तर त्याला अशी माहिती देण्याची गरज राहणार नाही. माणसाच्या मेंदूइतकाच प्रगल्भ आणि बुध्दीवान संगणक तयार झाला तर असे यंत्रमानव तयार होऊ शकतीलही. एास्त्रज्ञ असा संगणक बनविण्याचा आणि यंत्रमानवाला स्वयंपूर्ण बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यदाकदाचित हे शक्य झाले तर यंथमानव माणसापेक्षा वरचढ होऊन माणसालाच गुलाम बनवेल की काय अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. सुदैवाने माणसाची बुध्दी ही सध्या असणाऱ्या सर्वात आधुनिक व प्रगत संगणकाच्या दृष्टीनेदेखील फार मोठी व अतर्क्य गोेष्ट आहे. मेंदूच्या अभ्यासावर आता आपल्या शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
माणसाच्या मेंदूचा आकार लहान असला तरी त्यात असंख्य म्हणजे सुमारे १०० अब्ज न्यूरॉन किंवा मज्जापेशींचे जाळे असते. प्रत्येक मज्जापेशीत संदेश आणणारा डेन्ड्नइट व संदेश सोडणारा अॅक्झान असे तंतू असतात. एका पेशीचा डेन्ड्नइट दुसऱ्याच्या अॅक्झान जवळ असतो. सेकंदास हजार एवढ्या सूक्ष्म विद्युतलहरी त्यातून प्रवास करतात. एक मज्जापेशी एकावेळी २ लाख मज्जापेशींशी संपर्क साधू शकते. या संपर्कालाच मानवी बुध्दीच्या दृष्टीने फार महत्व आहे. मेंदूमध्ये कोठले कार्य कोठे चालते याबद्दल माणसाला ज्ञान झाले असले तरी ते कसे चालते याबद्दलचे गूढ अजूनही कायम आहे. संगणकाची रचना फार वेगळी असते. स्मृती, गणित, नियंत्रण, माहिती ग्राहक व दर्शक हे भाग वेगवेगळे असतात. शून्य आणि एक या सांकेतिक भाषेत ससंगणकाचे सर्व कार्य चालते. एकावेळी एकच क्रिया संगणक करू शकतो. याउलट मानवी मेंदूत संवेदना ग्रहण कृती व विचार करणे एकाच वेळी चालू असते. माणूस जन्मापासूनच्या असंख्य घटना, दृश्ये, त्यांचे परस्पर संबंध साठवून ठेवू शकतो आणि संदर्भानुसार कोणतीही घटना क्षणार्धात जागृत स्मृतीत आणू शकतो. या स्मृतीचा अंदाज केला तर अशी स्मृती साठविण्यास संगणकास अवाढव्य यंत्रणा लागेल. प्रकाश, आवाज, स्पर्श, वास, चव या सर्व संवेदना माणूस एकाच वेळी एखाद्या चित्रफितीप्रमाणे नोंदवून घेतो व त्याचे स्मृतीत रूपांतर करतो आणि पूर्वीच्या स्मृतींशी त्याचे नाते जोडतो. ही क्रिया जागृत अवस्थेत प्रत्येक क्षणी होत असते व त्यावेळी मेंदू दुसऱ्याच कोठल्यातरी स्मृतीसंदर्भात विचार करीत असतो. या तऱ्हेची क्षमता संगणकात आल्याखेरीज त्याला मेंदूसारखा म्हणता येणार नाही. देान वस्तूतील फरक ओळखण्यासाठी संगणकास त्या दोन्ही वस्तूंचा सर्वांगाने अभ्यास करावा लागतो. मात्र अगदी अशिक्षित गृहीणीदेखील अगदी एकसारख्या दिसणाऱ्या दोन भांड्यातील फरक ओळखू शकते. चेहऱ्यावर बदललेले भाव माणसाला २/१० सेकंदात ओळखता येतात. मेंदूची बरोबरी करण्यासाठी संगणकास याबाबतीतही बरीच प्रगती करावी लागेल.
मानवी स्मृती, ज्ञान व बुध्दी यांचा शोध घेतल्याशिवाय बुध्दीमान संगणक बनविता येणार नाही हे जाणून संशोधकांनी प्रयत्न सुरू केले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की येथे केवळ संगणकशास्त्र पुरे पडत नाही. एरीरशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी विविध दृष्टकोनातून त्याचा अभ्यास करावा लागतो.
इ.स. १६५० मध्ये थॉमस हॉब्जने विचार करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विशिष्ट संकल्पनांच्या गणिती क्रिया होत असे मत मांडले. १८९४ मध्ये जार्ज बुल या शास्त्रज्ञाने तर्कावर आधारित गणित बुलीयन लॉजिक या नावाने प्रसिध्द केले. सध्याचे सर्व संगणक ह्याच गणितावर आधारलेले आहेत. मात्र तर्कावर आधारलेल्या गणितास सत्य व स्पष्टपणे वर्गीकरण करता येईल अशी माहिती हवी असते. मेंदू मात्र अशा माहितीबरोबरच संदीग्ध, संभाव्य वा कमी विश्वसनीय अशा माहितीचाही परामर्श घेऊ शकतो. नियमांच्या चौकटीत बसणारे ते ज्ञान असे आपण समजल्यामुळे संपूर्ण ज्ञानाचे आपल्याला व पर्यायाने संगणकाला आकलन होऊ शकले नाही. कारण आपले संगणक फक्त तर्कावर आधारिलेल्या माहितीचाच विचार करू शकतात. मानवी बुध्दीमत्तेची वैशिष्ट्ये म्हणजे नवे ज्ञान मिळविण्याची किंवा शिकण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता. मानवी बुध्दीचे मूळ त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेत, व ही क्षमता मानवी मनात दडलेली असल्याने संगणकशास्त्रज्ञ सध्या मनाच्या आंतरस्वरूपाचा शोध घेत आहेत. कारणमीमांसा व कल्पनाशक्ती यांच्या सहाय्यनेच यावर काही प्रकाश पडू शकतो.
ज्ञान म्हणजे एक स्मृतींचा आकृतीबंध अशी कल्पना करता येते. यात स्मृती या शिरोबिंदू असून त्यातील संबंध हे शिरोबिंदूना जोडणारे बंध मानता येते. माणसाची एक अनोखी कला म्हणजे विसरण्याची व पुन्हा आठवण्याची क्रिया. संगणकात ही क्षमता आणण्यासाठी अशा आकृतीबंधाची कल्पना उपयोगी पडते. स्मृतीतील बंधांची ताकत काळानुसार कमी होत जाते व शेवटी बंध तुटतात म्हणजे माणूस विसरतो. मात्र जवळची स्मृती वा बंध वापरात आला की हा बंध पुन्हा पुर्ववत होतो. म्हणजे काही घटना घडली की त्या संदर्भातील स्मृती जागृत होतात. पण या स्मृती म्हणजे काय ? भाषा, चित्रे व संवेदना यांच्या स्वरूपात स्मृती साठविली जाते. माणूस विचार करतो वा आठवतो म्हणजे मन:पटलावर ते चित्र पहातो, ती माहिती वाचतो वा ती संवेदना अनुभवतो. मात्र स्मृतींमधला संबंध व घटनेतून ध्वनित होणारा अर्थ संगणकास शिकविणे हे एक अवघड काम आहे. कारण आपण नेहमी पाहतो एकाच घटनेचे वेगवेगळे अर्थ निघतात. माणसाच्या मन:स्थितीनुसार व इतर परिस्थितीनुसार हा अर्थ बदलून स्मृती बनते किंवा असे म्हणता येईल की पूर्वीच्या अनुभवाचा विचार करूनच माणूस घटनेचा अर्थ लावतो. म्हणजे पूर्वग्रहाशिवाय माणूस ज्ञान ग्रहण करू शकत नाही त्यामुळे त्याच्या स्मृतीदेखील त्याच्या पुर्वग्रहावर आधारित असतात. संगणकास असे पक्षपाती करता येणार नाही कारण त्याला स्वत:चे हित वा मत नसते.
काय गंमत आहे पहा. माणसाला कला सोपी वाटते तर शास्त्र अवघड वाटते. या उलट संगणकाचे आहे. त्याला शास्त्र नियमबध्द असल्याने लगेच आत्मसात होते. पण कला समजू शकत नाही. माणूस शास्त्रात पारंगत झाला म्हणजे आपण त्यास बुध्दीमान म्हणतो.संगणकाने कलेत प्राविण्य मिळविणे सोडा त्याला साधी कला समजली तरी त्याला बुध्दीमान म्हणावयास हवे.
इ. स. १९५१ मध्ये मार्विन मिन्स्की याने स्नार्क नावाचा मेंदूच्या कार्यसदृश्य चालणारा न्यूरो कॉम्प्युटर तयार केला. १९५८ मध्ये चित्रे ओळखणारा तर १९७२ मध्ये भाषा जाणणारा संगरक तयार झाला. मात्र नियमांपलिकडची भाषा त्याला समजेल काय ? 'तो कामाला वाघ आहे', 'त्याच्या डोक्यात कॉम्प्युटर बसविलाय` अशा वाक्यांचा अर्थ संगणक काय काढे कोण जाणे ? मग कविकल्पना, विनोद, मॉहर्न आर्ट, प्रेम, श्रध्दा यांना जाणणे तर संगणकाला कधीतरी ाक्य होईल काय ?
डॉ. वेंकट भास्कर वेमुरी या शास्त्रज्ञांनी मात्र याबाबत आशावाद दाखविला आहे. १९८७ साली सॅन डिएगोमध्ये व १९०८ मध्ये क्रॅलिफोर्निया मध्ये मज्जापेशींच्या संबंधावर आधारित संगणक या विषयावर परिसंवाद भरला. त्यावेळी हा आशावाद व्यक्त करण्यात आला. अमेरिकेत, एका भारतीयाच्या डॉ. वेंकटभास्कर वेमुलींच्या नेतृत्वाखाली या विषयावर संशोधन चालले आहे हे ऐकून तुम्हास निश्चितच धन्य वाटेल.
नुकतेच गेल्यावर्षी जपानने भाषा सर्वार्थाने जाणणारा संगणक तयार केल्याचे जाहीर केले आहे. हे संशोधन खरेच एके दिवशी मानवापेक्षा सरस यंत्रमानव बनवेल काय ? आणि तो यंत्रमानव माणसाचा सहाय्यक राहीला की माणसालाच गुलाम करेल हे भविष्यच जाणो...

प्रतिरसाकर्षण

पावसाचे पाणी शुद्ध असले तरी चातकासारखे ते आपल्याला वरच्यावर झेलून घेता येत नाही. ते जमिनीवर पडले की त्यात माती, सेंद्रिय पदार्थ व क्षार मिसळून ते दूषित होते. नदीनाल्यातील पाणी गढूळ असते व वापरण्यापूर्वी ते गाळून घ्यावे लागते. जमिनीखालचे पाणी स्वच्छ दिसले तरी त्यात क्षार विरघळलेले असतात. जलशुद्धीकरण व्यवस्थेत पाण्यातील क्षार वेगळे केले जात नाहीत. पाणी खारे असेल (उदा. समुद्राचे पाणी) तर ते आपणास पिण्यासाठी वापरता येत नाही.
खारे पाणी - समुद्राच्या पाण्यात एकूण विद्राव्य क्षार ३५००० मि. ग्रॅ./लि. एवढे असतात. त्यातील ३०००० मि. ग्रॅ./लि. मीठ किंवा सोडियम क्लोराईड असते. पिण्याच्या पाण्यासाठी विद्राव्य क्षार ५०० मि. ग्रॅ./लि.व क्लोराईड २०० मि. ग्रॅ./लि. पेक्षा कमी असणे इष्ट असते. त्यामुळे समुद्राचे पाणी त्यातील क्षार काढून टाकल्याखेरीज पिण्यायोग्य होऊ शकत नाही. समुद्रकाठच्या भागातील विहिरींच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण ५००० ते १०००० मि. ग्रॅ./लि. आढळते. शेतीसाठी जास्त पाणी व खते वापरल्याने जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून तेथील विहिरींचे पाणी पिण्यास वा शेतीसही निरुपयोगी होत आहे. अशा पाण्यात क्षारांचे प्रमाण २००० ते ५००० मि. ग्रॅ./लि. एवढे वाढलेले आढळते. खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविणे ही अतिशय कठीण व खर्चिक गोष्ट आहे. पृथ्वीवर समुद्राच्या स्वरूपात पाण्याचा फार मोठा साठा आहे तरी ते पाणी खारे आहे. यामुळेच जहाजावरील लोकांची पाणीच पाणी चहूकडे, पिण्यास थेंबही नसे रे अशी स्थिती होते. पाण्याचे ऊर्ध्वपातन करून शुद्ध पाणी मिळविता येते. परंतु त्यासाठी प्रचंड खर्च व ऊर्जा लागते. आता ही किमया करणारे नसे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याचे नाव प्रतिरसाकर्षण किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस.
रसाकर्षण - मनुक पाण्यात टाकली की ती थोड्या वेळात फुगते ही गोष्ट आपण अनुभवली असेल. पाणी मनुकेत शिरल्यामुळे असे झाले हे उघड आहे. मात्र साखरेच्या पाकात द्राक्ष टाकले तर ते आक्रसून जाते. असे का होते हे कोडे चटकन लक्षात येत नाही. द्राक्षातले पाणी पाकात शिरून द्राक्षाची मनुक होते. एके ठिकाणी पाणी बाहेरून आत तर दुसऱ्या ठिकाणी पाणी आतून बाहेर जाते. पाण्याच्या प्रवाहाची दिशा कशामुळे ठरते ? असा आपणास प्रश्न पडेल तर रसाकर्षण हे त्याचे उत्तर होय. द्राक्षाच्या सालीच्या आत व बाहेर पाण्याची घनता वेगळी असली की पाणी जास्त घनतेकडून कमी घनतेकडे वाहते. उंचावरचे पाणी खालच्या बाजूस वाहते तशीच ही क्रिया आहे. द्राक्षाची साल जास्त महत्वाची भूमिका बजावते. वनस्पतीची मुळे याच प्रकारची असतात. मुळातील पेशींमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील पाणी मुळांमध्ये शोषले जाते. या क्रियेलाच रसाकर्षण असे म्हणतात. मुळांच्या वा द्राक्षाच्या सालींमधून क्षार आरपार जाऊ शकतात. मात्र साखरेसारखे मोठे रेणू जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वनस्पती आवश्यक ते क्षार जमिनीतून शोषून घेऊ शकतात. खाऱ्या पाण्यात क्षार असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी अर्ध पारगम्य असणाऱ्या क्षाररोधक पडद्याचा वापर करावा लागतो.
प्रतिरसाकर्षण (रिव्हर्स ऑस्मॉसिस) - रसाकर्षणाच्या वरील गुणधर्माचा उपयोग करून मानवाने खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याची पद्धत विकसित केली आहे. विशिष्ट क्षाररोधक पडदा मध्ये ठेवून एका बाजूस खारे पाणी व दुसऱ्या बाजूस गोडे पाणी ठेवले तर रसाकर्षणाच्या तत्वानुसार गोडे पाणी क्षाररोधक पडद्यातून खाऱ्या पाण्याकडे जाईल. आकृती १ मध्ये दाखविल्याप्रमाणे मधल्या नळीत खारे पाणी असल्यास बाहेरचे खारे पाणी गोड्या पाण्यात शिरून नळीतील पाण्याची पातळी वाढेल. या पाण्याज्या उंचीलाच रसाकर्षण-दाब असे म्हणतात. नळीताल पाण्यावरील दट्ट्यावर या दाबापेक्षा जास्त दाब दिला (आकृती २ पहा) तर पाणी उलट दिशेने म्हणजे खाऱ्या पाण्याकडून गोड्या पाण्याकडे ढकलले जाईल. यालाच प्रतिरसाकर्षण असे म्हणतात. पडद्यातून क्षार पलिकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे काही खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर होईल. खाऱ्या पाण्याचा खारेपणा अधिक वाढेल व ते टाकून द्यावे लागेल. अशा रीतीने प्रतिरसाकर्षणाचा उपयोग करून खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर केले जाते.
वेगवेगळे पदार्थ रेणूंच्या आकारानुसार पाण्यातून काढून टाकण्यासाठी सूक्ष्म छिद्रे असणारे पडदे वापरले जातात. त्यांचे कार्य गाळण्याचे असल्याने त्यांना अतिसूक्ष्म गाळक म्हणतात. प्रतिरसाकर्षणाचे पडदे अशा अतिसूक्ष्म गाळकांपेक्षा फार निराळे असतात. त्यांना अर्धपारगम्य पडदे असे म्हणतात.
संशोधन - १९५० साली अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या रीड, ब्रेंटन इ. शास्त्रज्ञांनी सेल्यूलोज अॅसिटेटचा पडदा तयार करून त्याने पाण्यातील क्षार अडविले जातात हे सिद्ध केले. त्यानंतर लगेच क्रॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील लोएब व सोराईराजन यांनी असा पडदा तयार करण्याचे नवे तंत्र विकसित करून ४० ते ५० बार दाबाखाली दिवसाला दर चौ.मी. पडद्यातून ५०० ते १००० लिटर गोडे पाणी मिळविता येते हे दाखवून दिले. यावेळी ९५% क्षार पडद्यामुळे अडविले गेले. भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. खाऱ्या पाण्यावर संशोधन करण्यासाठी गुजराथमधील भावनगर येथे सेंट्न्ल सॉल्ट अॅण्ड मरीन इस्टिट्यूट स्थापन करण्यात आलेली आहे. प्रतिरसाकर्षण यंत्रणेवर तेथे संशोधन चालू आहे. सध्या विहिरीतील जास्त क्षार असलेल्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी मिळविण्यात संस्थेला यश आले असून ग्रामीण भागातील पाण्याची समस्या त्यामुळे सुटणार आहे. नीरी, नागपूर येथेही सेल्यूलोज अॅसिटेटचा पडदा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
समुद्राच्या पाण्याचा रसाकर्षण दाब २० बार म्हणजे हवेच्या दाबाच्या २० पट असतो. शिवाय पाणी शुद्ध होत असताना खाऱ्या पाण्याचा खारेपणा वाढत असल्याने रसाकर्षण दाबही वाढत जातो. त्यामुळे प्रतिरसाकर्षण यंत्रणा ६० ते ७० बार एवढ्या दाबावर चालवावी लागते. विहिरीच्या पाण्यातील क्षार काढण्यासाठी १५ ते ३० बार एवढा दाब पुरेसा होतो. क्षाररोधक पडदा नाजुक असल्याने प्रचंड दाबाखाली तो फाटू नये म्हणून त्याला आधारासाठी प्लॅस्टिकची जाळी वापरली जाते. प्रवाह मंद असल्याने खूप मोठा पृष्ठभाग वापरावा लागतो. यासाठी वेगवेगळया प्रकारचे पडदे वापरले जातात.
१. सूक्ष्म धागे - हे धागे केसापेक्षा बारीक असून आतून पोकळ असतात. धाग्याबाहेर खारेे पाणी तर आत गोडे पाणी असते. सेल्यूलोज अॅसिटेटशिवाय पॉलिव्हिनॉईल अल्कोहोल व पॉलिअमाईड यांचे ते पडदे बनविलेले असतात.
२. सपाट पडदा वा गुंडाळी पडदा - सपाट पडदा व आधारासाठी प्लॅस्टिकची जाळी यांचे एकाआड एक थर देऊन सपाट वा गुंडाळी स्वरूपात याची रचना केलेली असते. आकृती ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे खारे पाणी, गोडे पाणी व अतिखारे पाणी यांचे नळ असतात.
३. नळीच्या स्वरूपात - १२ मि. मी. ते २५ मि. मी.व्यासाच्या नळयांच्या स्वरूपात पडदे तयार करण्यात येतात. अशा प्रकारची रचना गढूळ पाण्यासाठी जास्त उपयुक्त असते. कारण पाण्याचा ब्रवाह सोडून या नळया स्वच्छ करता येतात. अर्थात येथे पृष्ठभाग छोटा असल्याने फार कमी गोडे पाणी मिळू शकते.
पूर्व प्रक्रिया - प्रतिरसाकर्षणयंत्रणेच्या संकल्पनेसाठी रसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र याचबरोबर पडद्यावर साठणारे क्षारांचे थर वा जिवाणूंमुळे पडद्यावर होणारी कुजण्याची क्रिया यांचे चांगले ज्ञान असावे लागते. पाण्याचा गढूळपणा, त्यात विरघळलेले वायू, तापमान, पी. एच्. क्लोरीन, क्षारांचे प्रमाण व पडद्याची गाळणक्षमता यांची माहिती असावी लागते. या माहितीवरून पाण्यावर प्रथम कोणत्या प्रक्रिया करणे आवश्यक आहे ते ठरविता येते. पाणी गाळणे, वायुवीजन, रेझिन थरातून गाळणे या प्रक्रिया केल्यास प्रतिरसाकर्षणाचे कार्य व्यवस्थित चालते आणि पडद्याची हानी होत नाही. पडद्यावर क्रॅल्शियम कार्बोनेटचा थर बसू नये म्हणून आम्ल व आवश्यक भासल्यास फॉस्फेट मिसळले जाते. प्रतिरसाकर्षणासाठी वापरावयाच्या खाऱ्या पाण्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे असावेत.
लोह ०.१ मि. ग्रॅ. / लि. पेक्षा कमी मँगेनीज ०.०५ मि. ग्रॅ. / लि. पेक्षा कमी क्लोरीन ०.१ मि. ग्रॅ. / लि. पेक्षा कमी गढूळपणा अजिबात नसावा. (गाळणे आवश्यक)
गोडे पाणी कमी असणाऱ्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रतिरसाकर्षणाच्या तत्वावर चालणाऱ्या मोठ्या यंत्रणा उभारण्यात आल्या असून तेथे समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनविण्यात येते. प्रतिरसाकर्षणाचे भविष्याकाळातील महत्व ओळखून अनेक परदेशी कंपन्या यात संशोधन करीत असून त्या असे तंत्रज्ञान पुरविण्यास तयार झाल्या आहेत. भारतानेही यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.
इतर उपयोग - प्रतिरसाकर्षणाचा उपयोग आता विविध क्षेत्रात होऊ लागला आहे. उद्योगधंद्यातून व कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यातील दूषित द्रव्ये वेगळी करून पाणी शुद्ध करणे या तंत्रज्ञानाने शक्य झाल्याने प्रदूषण टाळून पाण्याचा पुनर्वापर करता येऊ लागला आहे. औषध निर्मिती, फळांचे रस, मद्यार्क, दूध आणि इतर अन्नप्रक्रिया केंद्रामध्येही या तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग होऊ लागला आहे. प्रतिरसाकर्षण हे मानवाला एक नवीन वरदानच लाभले आहे.

Wednesday, May 16, 2007

Toy Mania in US

Since my visit to USA three years back, I am becoming increasingly restless about the way the toy industry is handling American children.
The toys there are a weird mixture of Dianosors, robots and magic. The general aim of toy is fight. Children are required to learn funny distorted words and characters, made to believe impossible and create false image of science as almighty which can do anything. The children are subjected to market propaganda to make them dreamy, intolerable and without the knowledge of outside world.I was surprised to find that children's books and movies also have been totally captureed by toy industry. Harry Potter's success is one example of the mood. Even too much stress on robotics and war technics make the children aggressive.If the new generation is forced into this mentality with business interests, where are we leading to.Western people used to criticise false magic of arebian nights and animal stories in Panchtantra, Ramayana and other religious stories as fake and of poor quality, what is the sum and substance of present day toys and children's books. Ther should be serious thinking by educationists about this entertainment method with possible dire consequenses in future.