Saturday, May 21, 2011

Far from the madding crowd


‘Far from the madding crowd’ (गर्दी व कोलाहलापासून दूर) या शीर्षकाचे थॉमस हार्डीचे पुस्तक मी पाहिले तेव्हा त्यात काय असेल याविषयी माझ्या मनात कुतुहल निर्माण झाले.

यापूर्वी मी ‘Two on a Tower’ ( मनोर्‍यावरील दोघे) ही याच लेखकाची कादंबरी वाचली होती. अवकाशातील तार्‍यांचे संशोधन करणारा स्विदिन व त्याच्यावर प्रेम करणारी व्हिवियन या दोघांच्या व्यक्तिचित्रणावर आधारलेली व आकाशदर्शनाची दुर्बीण असणार्‍या मनोर्‍याची पार्श्वभूमी असणारी ती कथा कादंबरीच्या नावाला साजेशी होती. तसेच काहीसे या नव्या कादंबरीत मला वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. माझी त्याबाबतीत थोडी निराशा झाली मात्र कादंबरीच्या नावाने मात्र मला विलक्षण भुरळ घातली.
माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ते Monk who sold his Ferrari हे पुस्तक. मानसिक तणावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपली संपत्ती सोडून हिमालयात जाणार्‍या माणसाची कथा त्यात सांगितली आहे. पूर्वी याच कारणासाठी आत्मज्ञानाचा शोध घेण्यासाठी साधु संन्यासी वनात वा लोकवस्तीपासून दूर जात असत.

गर्दी आणि कोलाहल यांनी माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे.सकाळी उठल्यापासून वर्तमानपत्रे, रेडिओ व दूरदर्शन यातील भडक बातम्या व जाहिराती यांचा मारा सुरू होतो. गडबडीने सर्व आवरून कामावर जायचे म्हटले की रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. बस स्टॉपवरील वा रेल्वे तिकिटांसाठी रांगा, बस वा लोकलमधील गर्दी नेहमीची असतेच. पण मोर्चे, रास्ता रोको, सभा वा नेत्यांचे दौरे असले की अशा प्रवासातही बराच मनस्ताप होतो.कामावरून येतानाही यापासून सुटका नसते. जेवणाचा डबा असला तर ठीक अन्यथा हॉटेल वा ठेल्यावरही गर्दी चुकत नाही. संध्याकाळी फिरायला वा देवळात जायचे म्हटले तरी तेथेही हातगाड्या, खेळ व खाद्याची दुकाने व माणसांची वर्दळ असतेच मार्केटिंगला जायचे म्हटले की झगमगाट करणार्‍या दिव्यांनी उजळून निघालेल्या दुकानातूनच फिरावे लागते. कामावरून घरी आले की टीव्ही आपली वाटच पहात असतो. रात्री झोपेपर्यंत तो आपल्याला सोडत नाही.

वर उल्लेखिलेली गर्दी व त्यामुळे होणारा मानसिक तणाव शहरी माणसाला अंगवळणी पडला आहे. शहरातील माणसे एखाद्या यंत्रातील भागाप्रमाणे बिनतक्रार असे तणाव सोसत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी जाऊन ते मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करतात.

मला ज्या गर्दी व कोलाहलाबद्द्ल काळजी वाटते त्याचा वरील भौतिक पातळीवरील गर्दी व कोलाहलाशी काही संबंध नाही. आज राजकीय व समाजजीवनात फार वेगाने स्थित्यंतरे होत आहेत. पक्ष व निष्ठा सोयीनुसार बदलल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांतून संस्कारक्षम, विधायक बातम्यांऎवजी अन्य भडक बातम्यांना व विषयांना अवास्तव महत्व दिले जात आहे व दुर्दैवाने समाज अशा कल्लोळात गुरफटला जाऊन भोगवादी व आत्मकेंद्रित बनत चालला आहे. सौहार्द, सहसंवेदना, प्रेम, आदर, विश्वासार्हता यांना वैयक्तिक जीवनात महत्व उरलेले नाही. आदर्श लोप पावत आहेत. ‘सर्वे गुणाः कांचनमाश्रयंती’ या उक्तीप्रमाणे पैसा व सत्ता असणारे लोकच आपले कल्याण करू शकतात हा समज दृढ होत आहे.
स्वार्थ, परस्पर हेवेदावे, भ्रष्टाचार, जुलूमजबरदस्ती व विध्वंसक कारवाया यामुळे समाज कधी नव्हे एवढा अस्थिर, असुरक्षित व विघटित झाला आहे.

लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली तरी माणसे एकमेकांपासून दूर गेली आहेत. अपघात झाला, एखादा भूकबळी गेला, एखाद्याने आत्महत्या केली, कोठे आग लागली तर भोवताली मदतीसाठी गर्दी जमत नाही तर असलेली गर्दी विखरुन जाते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरही गुन्हेगारीचा शिक्का बसला की समाज त्या माणसाचे सारे गुण व कर्तृत्व विसरून त्याला प्राण्याहून हीन वागणूक देत आहे. चोरीत सापडलेल्यांना वा अपघात करणार्‍यांना वा मोर्चा काढणार्‍या लोकांना वा शासकीय नियम पाळणार्‍या अधिकार्‍यांना निर्दयपणे मारहाण करताना समाजाला माणुसकीचा विसर पडतो आहे.

भ्रष्टाचाराखाली बड्या नेत्यांना व अधिकार्‍यांना अटक झाल्याच्या बातम्या आवडीने वाचणारी व त्यावर तासन्‌ तास गप्पा मारणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात वा व्यवहारात पैसे देणे व घेणे निषिद्ध समजत नाहीत.त्यामुळे या चर्चा, मुलाखती, मेळावे व आंदोलने, बातम्या आणि भांडणे म्हणजे समाजाला शाश्वत जीवनमूल्यांपासून दूर ठेवण्यासाठी केलेला अर्थहीन कोलाहल वाटतो.

अशा गर्दीपासून व कोलाहलापासून दूर गेले तरच मनाला खरी शांतता मिळेल. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शांततेसाठी अशा जागाच नाहिशा होत आहेत व माणसेही तेथे जाण्यास सुरक्षेच्या कारणास्तव घाबरत आहेत. वाघसिंहांपेक्षा माणसांचीच भिती त्यांना वाटत आहे.

Ayn Rand च्या Atlos Shrugged या कादंबरीत ज्याप्रमाणे सर्व सृजनशील माणसे भ्रष्ट व स्वार्थी समाजापासून दूर जाऊन त्यांचे वेगळे विश्व तयार करतात व त्याचा परिणाम उरलेल्या समाजाचे सारे जीवनव्यवहार ठप्प होण्यात होतो हे दर्शविले आहे. त्याप्रमाणे सध्याच्या काळात ज्याला काही विधायक कार्य करायचे असेल, ज्ञान संपादन करायचे असेल वा नवनिर्मिती करायची असेल त्याने या कोलाहलापासून स्वतःला शरिराने शक्य झाले नाही तरी मनाने दूर रहावयास हवे.

Friday, May 20, 2011

गरिबांची जनगणना

भारतातील दारिद्र्यरेषेखालील सर्व गरिबांची जनगणना करण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम शासन हाती घेणार आहे ही बातमी वाचली व मोठी गंमत वाटली. जंगलात किती वाघ वा सिंह आहेत किंवा कोठे व किती दुर्मिळ वनस्पती आहेत याचा शोध घेणे मी समजू शकतो. पण रस्तोरस्ती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भीक मागणारी माणसे, झोपडपट्ट्यात राहणारी, प्लॅटफार्मवर वा पदपथावर झोपणारी माणसे, छोट्या टपर्‍या वा हातगाडीवर व्यवसाय करणारी वा शेतात व उद्योगात तुटपुंज्या वेतनावर राबणारी माणसे सर्व ठिकाणी दिसत असूनही त्यांची संख्या मोजण्याने काय साध्य होणार आहे तेच कळत नाही.

मार्क ट्वेनने ‘स्टोलन व्हाईट एलेफंट’ नावाची एक रुपक कथा लिहिली आहे. चोरी गेलेल्या(?) पांढर्‍या हत्तीचा शोध घेण्यासाठी स्कॉटलंड यार्ड ही गुप्तहेर संघटना कसे प्रयत्न करते याचे मजेदार वर्णन त्यात आहे. तो हत्ती राजरोसपणे हिंडताना दिसल्याचे लोकांनी सागितले तरी त्यावर विश्वास ठेवला जात नाही.

अशा जनगणनेचा उद्देश गरिबांच्या विकासासाठी योजना आखण्यासाठी होईल असे सांगितले जाते. मात्र हे एवढे गरीब का निर्माण झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. शोषणविरहित समाजरचना केल्याशिवाय व पैशाचे अनन्यसाधारण महत्व कमी केल्याशिवाय हे साध्य होणार नाही. गरिबांना मदत केवळ शासनाने न देता सभोवतालच्या समाजाने ती जबाबदारी उचलावयास हवी. आपल्या गावात कोणावरही भीक मागण्याची पाळी येऊ नये याची खबरदारी व तेवढी आर्थिक तरतूद प्रत्येक गावाला सहज करता येण्यासारखी आहे.

मात्र प्रत्यक्षात काय दिसते. कर्ज वा व्यसने व अंधश्रद्धा यांच्या विळख्यात ठेवून त्यांचे पैसे लुबाडण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत. याच गरजू गरिबांना हाताशी धरून पैसा व सत्ता मिळविण्याचे प्रयत्न होताना दिसतात. निवारा, अन्न, आरोग्य व शिक्षण या प्रत्येक क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. गरिबीत पिचलेल्या व अन्यायाने चिडलेल्या गरिबांचा उपयोग केवळ दंगल, गुन्हेगारी, दहशत वा विध्वंसाच्या कामासाठी करून राजकीय पक्ष आपले महत्व वाढवतात.

कायद्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून गरिबांच्या जमिनी काढून घेणे, उच्च मध्यमवर्गीयांच्या सुखसोयी व व्यवसायासाठी अतिक्रमण हटावच्या साळसूद उद्देशाने व छोट्या टपर्‍या, हातगाड्या जप्त करणे, झोपडपट्ट्या हटविणे, शिस्तीच्या व स्वच्छ्तेच्या नावाखाली सार्वजनिक जागी झोपलेल्यांना व राहणार्‍यांना हुसकून लावणे या सर्व गोष्टी आपला समाज व शासन गरिबांविषयी कमालीचे उदासीन झाल्याचे दर्शवितात.

गरिबांचे प्रश्न जाणून घेण्याचा व त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न भोवतालच्या समाजाने केल्यासच गरिबी नाहिशी होईल. जनगणनेमुळे केवळ आपण त्यांच्यासाठी फार मोठे कार्य करीत आहोत असे समाधान मिळेल गरिबांनाही पुढील विकासाची स्वप्ने दाखवून गप्प करता येईल मात्र गरिबी अशीच वाढत राहील.

आजकाल अशा सर्वेक्षणांना फार महत्व आले आहे. कचर्‍याचे ढीग व घाण पाणी वाहणारे नदीनाले दिसत असूनही प्रदूषण शोधण्यासाठी गावागावातून नमुना तपासणीचे खर्चिक प्रकल्प राबविले जातात. मोठे प्रकल्प आखले जातात. पैशाच्या कमतरतेमुळे ते पूर्ण होण्यास बराच विलंब होतो व खर्च वाढल्याने ते तसेच प्रलंबित राहतात वा त्यास अनेक फाटे फुटून व विरोध होऊन ते गुंडाळले जातात. परिणामी आहे तीच स्थिती कायम राहते वा हळुहळू आणखी बिघडत जाते.

यासाठी प्रश्नांचे केवळ मूल्यमापन करण्यात वेळ व पैसा न घालवता प्रश्न त्वरित सोडविण्यावर भर दिला पाहिजे व मुळात प्रश्न निर्माणच होणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना करावयास हवी.

अशा सर्वेक्षणास बराच खर्च येतो. हा पैसा गरिबांना न मिळता इतरांनाच मिळतो. विकेद्रित विकास हा स्थायी असतो. गरीबी निर्मूलनासाठी वेगळा निधी ठेवण्यापेक्षा तो नजिकच्या आस्थापनांतून व उच्चभ्रू लोकवस्तीतून कसा उभा करता येल याचा विचार व्हावयास हवा. केवळ पैसा वा वेतन वाढविल्याने गरिबी हटणार नाही. तर त्या पैशाचा योग्य विनियोग होत आहे की नाही याची जबाबदारी निश्चित करणे व त्यासाठी मार्गदर्शक तत्वे विकसित करणे आवश्यक आहे.

उद्योग व व्यवसाय या सारख्या आस्थापनांवर केवळ किमान वेतनाचे नियम घालून चालणार नाही तर ते पैसे दारु, जुगार, चैनीसाठी खर्च होत नाहीत ना याची काळजी घेणे, कर्मचार्‍यांच्या घरात आरोग्य व स्वास्थ्य राखणे, अडीनडीला कमी व्याजाने पैसा उपलब्ध करणे याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकावयास हवी.

हीच व्यवस्था गल्ली व मोहल्यामोहल्यात केली मोठ्या अपार्टमेंट वा बिल्डिंगमधील लोकांवर भोवतालच्या झोपडपट्टीच्या विकासाची जबादारी टाकली तर ती स्थायी स्वरुपाची सहजीवनाची नांदी ठरेल.

सेवाभावी संस्था असे कार्य कोणताही गाजावाजा न करता करीत असतात. त्यांना मदत करून अधिक सक्षम बनविले तर हे साध्य होऊ शकेल.

Thursday, May 19, 2011

जॉर्ज ऑर्वेलची रूपक कथा ‘अ‍ॅनिमल फार्म’



स्वतः समाजवादी असूनही रशियातील स्टॅलिन राजवटीतील विदारक सत्य लोकांसमोर आणण्यासाठी जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने ‘अ‍ॅनिमल फार्म’ या नावाची रुपक कथा १९४३ मध्ये लिहिली. मात्र त्यावेळी रशिया नाझी जर्मनीच्या विरुद्ध असल्याने इंग्लंड, अमेरिकेत स्टॅलिनची राजवट लोकप्रिय होती व कोणीही ते पुस्तक छापण्यास तयार होईना. दुसर्‍या महायुद्धानंतर ते छापले गेले.

अ‍ॅनिमल फार्म ही कथा इंग्लंडमधील मिस्टर जोन्स नावाच्या शेतकर्‍याच्या फार्ममध्ये असणार्‍या प्राण्यांच्या क्रांतीविषयी आहे. या फार्ममध्ये गाई, घोडे, डुकरे, कुत्री असे अनेक प्राणी असतात. आपण कष्ट करतो पण आपला मालक आयता बसून खातो व आपल्यावर हुकुमत गाजवतो हे मनोर नावाचे वृद्ध रानटी डुक्कर सर्वांना सांगते व ही सत्ता झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचा सल्ला देते. त्याप्रमाणे सर्व प्राणी एकत्र होऊन मालकाला पिटाळून लावतात.

नेपोलियन नावाचे डुक्कर त्यांचा नेता बनते. पण तेही हुकुमशहासारखे वागून स्वतः चैन करते व पोलिस कुत्र्यांच्या मदतीने इतर सर्व प्राण्यांवर जुलूम करते. त्याच्या राजवटीची भलावण करत स्क्वीलर हे हुशार डुक्कर आपल्या प्रचार यंत्रणेचा वापर करून सर्व प्राण्यांना नेपोलियनच त्यांचा उद्धारकर्ता आहे व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यातच त्यांचे कसे हित आहे हे पटवून देते. सर्व प्राणी समान आहेत पण त्यातले काही प्राणी जास्त समान आहेत हे नवे तत्व उदयास येते.

मिस्टर जोन्स पुनः फार्मवर कबजा करण्यासाठी येतो त्यावेळी स्नोबॉल हे उदारमतवादी डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून तो प्रयत्न हाणून पाडते. मात्र स्नोबॉल आपल्याला प्रतिस्पर्धी होईल या भितीने नेपोलियन त्याच्या सुधारणांना विरोध करून त्याच्यामागे त्याचे कुत्री सोडून त्याला फार्ममधून पळवून लावतो. त्याची सत्ता मग पूर्वीच्या स्थितीपेक्षाही अधिक वाईट आहे हे इतर प्राण्यांच्या लक्षात येते.

कथेचा शेवट फार मार्मिक केला आहे. नेपोलियन व त्याचे साथीदार दारु पीत व जुगार खेळत बसलेले इतर प्राण्यांना खिडकीतून दिसते. ही आपल्यातली डुकरे आहेत की पूर्वीच्या मालकाची माणसे आहेत असा त्यांना संभ्रम पडतो.

राज्य भांडवलशाही असो, साम्राज्यवादी असो वा समाजवादी विचारसरणीचे असो, राजकीय सत्तेतून भ्रष्टाचार कसा जन्माला येतो आणि खॊटे तत्वज्ञानही लोकांच्या गळ्यात उतरवण्यास भाषा व प्रचारयंत्रणा कशी साहाय्यभूत ठरते. हे या रुपकाचे सार आहे.

(Animal Farm’s commentary on the corruptive nature of political power and the power of language as a tool of ideology and control rings so true that it continues to play out in the political world as a sort of self-fulfilling prophecy.)

Sunday, May 8, 2011

ओझोनच्या थरातील घट

प्रास्तविक - पृथ्वीवरील वातावरण हा पर्यावरणाचा सर्वात गतीमान घटक आहे. वातावरणातील घटक, त्याचे तापमान आणि स्वयंशुद्धीकरण क्षमता यात पृथ्वीच्या जन्मापासून सतत बदल घडत आले आहेत. तरीदेखील मानवी इतिहासाच्या कालखंडातील या बदलाची गती गेल्या दोन शतकांत पूर्वी कधी नव्हती एवढी जास्त वाढली आहे.
हवा प्रदूषण
पावसाच्या पाण्याबरोबर आम्ल (अ‍ॅसिड) येणे व त्यामुळे सजीव सृष्टी व इतर साधनसंपत्तीवर विपरित परिणाम होणे, शहरातील विषारी धुके(SMOG), हरित गृह परिणाम ( ग्रीन हाऊस इफेक्ट) आणि स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचा थर कमी होणे ही त्यातली काही उदाहरणे होत.
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सोडले तर हवेतील ९९.९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन व इतर पूर्णपणे निष्क्रीय असणार्‍या वायूंचे असते व हे प्रमाण मनुष्यप्राण्याच्या जन्मापासूनच्या इतिहासात कायम राहिलेले दिसते. याचा अर्थ असा की हवेतील अत्यल्प प्रमाणात असणार्‍या दूषित वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवा प्रदूषण होते. या वायूंमध्ये सल्फर डाय ऑक्साईड(SO2), नायट्रोजन ऑक्साईड्स ( ज्याना एकत्रितपणे एनोएक्स NOx म्हटले जाते ), नायट्रिक ऑक्साईड व नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि अनेक प्रकारची क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचा मुखत्वे समावेश होतो.
ओझोनच्या थरात घट
या दशकात पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थरात घट होणे हे नवे संकट निर्माण झाले असून त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वासच धोका पोहोचण्याची शक्यता आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.

पृथ्वीच्या वातावरणात ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर व एक्झोस्फिअर असे थर असतात.

त्यातील स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन वायूचे प्रमाण जास्त आढळते. या वायूमुळे हानीकारक वैश्विक किरण ( मुख्यत्वे अल्ट्राव्हायोलेट किरण) थोपविले जात असल्याने ते जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या थराची जाडी कमी झाली तर हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण वाढेल व त्यामुळे सजीव सृष्टीस धोका पोहोचेल अशी शास्त्रज्ञांना भीती वाटते.ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी १९८५ मध्ये अंटार्टिकावरील ओझोनच्या थराला भोक असल्याचे ( तेथील थराची जाडी कमी असल्याचे) शोधून काढले.

ओझोनच्या थरात घट होण्याची कारणे
हवा प्रदूषणास कारणीभूत असणारे वायू ओझोनचे विघटन करतात असे आढळून आले आहे. यात क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे, विशेषतः CFC-11 (CFCL3) आणि CFC-12(CFCl2) ही संयुगे यांचा समावेश होतो.गेल्या काही दशकात अतिसूक्ष्म थेंबांच्या स्वरुपातील सुवासिक द्रव्ये, फेस निर्माण करणारी रसायने तयार करण्यासाठी या संयुगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला.शीतकामध्ये बाष्पशील वायू म्हणूनही फ्रिऑनचा वापर करण्यात आला. यांचा प्रत्यक्ष सजीव सृष्टीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही मात्र ही संयुगे हवेतील मिश्रणामुळे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचली की तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्यांच्यावर मारा होऊन त्यांचे विघटन होते ClOx आणि BrOx हे रॅडिकल तयार होतात व त्यातून क्लोरीन वायू सुटा होतो. क्लोरीन ओझोनचे विघटन होऊन त्याचे ऑक्सिजन मध्ये रुपांतर हॊण्यास साहाय्यक ठरतो. क्लोरीन वायू तसाच राहिल्याने एका क्लोरीनच्या अणुमुळे हजारो ओझोन रेणूंचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर होते. ओझोनचे विघटन करणार्‍या या क्लोरिनेटेड संयुगांचे स्ट्रॅटोस्फिअरमधील प्रमाण पूर्वीच्या मानाने ४ ते ५ पटीने वाढले आहे व त्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होत आहे.
ओझोनच्या थरातील घट - दुष्परिणाम
जर ही स्थिती अशीच चालू राहिली तर नजिकच्या भविष्यकाळात अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरित परिणाम होईल. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल.

याशिवाय अल्ट्राव्हायोलेट किरण शोषले न गेल्याने उष्णता निर्माण होण्याची क्रिया थांबेल त्यामुळे वातावरण थराच्या तापमानात घट होऊन त्याचा परिणाम वातावरणातील वार्‍यांच्या दिशा व गतीवर हॊईल. सूनामीसारखी संकटे वाढलील व शेवटी सार्‍या जीवसृष्टीचा सर्वनाश होईल.

Wednesday, May 4, 2011

प्रदूषण निदर्शक जलपर्णी

पंचगंगा नदीतील जलपर्णी
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. जलपर्णी पूर्ण काढून टाकली की नदी प्रदूषणमुक्त होईल अशी लोकांची समजूत असते. मात्र जलपर्णी समूळ नाहिशी करण्याचे काम अशक्यप्राय आहे हे नंतर दिसून येते. पावसाळा आला की जलपर्णी वाहून जाते. प्रदूषणाचा प्रश्नही विस्मृतीत जातो.
मुळा नदीतील जलपर्णी व जलपर्णी काढण्याची यंत्रणा


जलपर्णी म्हणजेच प्रदूषण व जलपर्णी काढली की नदी प्रदूषणमुक्त होईल हा समज मात्र पूर्ण चुकीचा आहे. जलपर्णी वाढणे हा प्रदूषणाचा परिणाम आहे कारण नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.

शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणार्‍या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो.हे आपल्या लक्षात येत नाही. कारण हे जीवाणू आपल्याला दिसत नाहीत.

जलपर्णीची वाढ ही त्या अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णी म्हणजे प्रदूषण नव्हे. जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. व जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.

मात्र नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या गुणधर्माचा उपयोग करून या जलपर्णीचा उपयोग सांडपाणी शुद्धीकरणासाठी केला जातो हे ऎकून आपल्याला आश्चर्य वाटेल. सूर्यप्रकाशाखेरीज वेगळ्या ऊर्जेची गरज नसणारी ही पद्धत आता अधिक प्रभावी व कमी खर्चाची असल्याने भारतात अधिक मान्यता पावत आहे.

Sunday, May 1, 2011

कृष्णा नदी प्रदूषणः कारणे

कृष्णा नदीः
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते. महाराष्ट्रातील ती एक महत्वाची नदी असून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णा व तिच्या उपनद्यांचे खोरे आहे. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावून डोंगराळ भागातून मार्गक्रमण करीत ५० कि.मी नंतर वाईला येऊन पोचते तेथून पुढचा महाराष्ट्रातील सुमारे २७० कि. मी. चा प्रवास सपाट प्रदेशातून नागमोडी मार्गाने पार करीत ती नृसिहवाडी नंतर कर्नाटक राज्यांत शिरते. नदीच्या उगमापासून कराडपर्यत नदीचा प्रवाह कमी असून कराडला कोयना मिळाल्यावर कोयना धरणातील पाण्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होते. कराड पासून सांगली पर्यतचा भाग बागायती शेती असून औद्योगिक दृष्टयाही अतिशय प्रगत आहे. कराड, इस्लामपूर, सांगली अशी मोठी शहरे व अनेक छोटी गावे या नदीच्या दोन्ही काठांना वसली आहेत. त्यामुळे या भागातील प्रदूषणाचा विचार या लेखात केला आहे.

बिगर मोसमी काळात कृष्णा नदीचा प्रवाह कृष्णेवरील वाई येथे असणारे धोम धरण व कोयनेवरील कोयना धरण यातून सोडल्या जाणार्‍या पाण्यावर अवलंबून असतो. पाणी साठविण्यासाठी नदीवर खोडशी, बहे, बोरगांव, नागठाणे, डिग्रज, सांगली येथे बांधारे बांधले आहेत. एका बंधार्‍याचे पाणी दुसर्‍या बंधार्‍यास टेकेल अशा रितीने बंधार्‍यांच्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. पावसाळ्याचा काळ सोडला तर नदी ही नदी न राहता बंधार्‍यांमागे साठलेल्या तलावांची साखळी या स्वरुपात कार्य करते. त्यामुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमानात पाण्यात मिसळू शकत नाही व नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस फार मोठी मर्यादा पडते.

१) शेतीसाठी पाण्याचा वापरः
नदीच्या एकूण पाण्याच्या वापरापैकी ८० ते ९० टक्के पाणी मुख्यत्वे शेतीसाठी वापरले जाते असे आढळून आले आहे. शेतीसाठी कृष्णा नदीवर अनेक उपसा जलसिंचन योजना असून कृष्णा कालव्याचाही उपयोग होतो. औद्योगिक वापरासाठी व शहरांसाठी लागणारे पाणीही या बंधार्‍यात साठणार्‍या पाण्यातून उचलण्यासाठी अनेक उपसा योजना कार्यान्वित आहेत. या सर्व कारणासाठी वापरलेल्या पाण्यातील काही भाग दूषित पदार्थ व क्षार यांच्यासह नदीच्या पाण्यात ठिकठिकाणाच्या नाल्यांद्वारे मिसळतो व प्रदूषणास कारणीभूत ठरतो.पाण्याची उपलब्धता भरपूर असली तरी ती अनिश्चित असल्याने शेतकरी मिळेल तेंव्हा शेतीला भरपूर पाणी पाजतो. यामुळे शेतीला फायदा न होता उलट नुकसानच होते. शिवाय जादा झालेले पाणी जमीन खराब करते. वा परत वाहत येऊन नदीस मिळते. अशावेळी या पाण्याबरोबर खते, कीटकनाशके, सांडपाणी व क्षारही पाण्यात मिसळतात. डिग्रज भागातील हजारो एकर जमीन पाण्याच्या जादा वापराने क्षारपड व नापीक झाली आहे. हे प्रत्यक्ष उदाहरण शेतकर्‍यांपुढे असूनही पाण्याचा शास्त्रीय व काटकसरीने वापर करण्याबाबत अजून, फारशी प्रगती झालेली नाही

२) औद्योगिक प्रदुषण
अ) साखर कारखाने : उसापासून साखर तयार करताना बाहेर पडणार्‍याम सांडपाण्यात तेले, चिपडाचे कण व १००० ते १५०० मि. ग्रॅ/लि. पर्यत बी. ओ. डी (सेंद्रीय पदार्थ) हे दूषित पदार्थ असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींप्रमाणे या भागातील सर्व साखर कारखान्यांनी सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविल्या आहेत. प्रक्रिया केलेले सांडपाणी, चांगल्या पाण्याने सौंम्य करून शेतीसाठी वापरले जाते. यावेळी सांडपाण्याचा बी. ओ. डी. १०० मि. ग्रॅ/लि पेक्षा कमी असावा लागतो. सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा योग्यरितीने कार्य करीत नसेल तर जमीन व पाण्याचे प्रदूषण होऊ शकते. नादुरुस्त यंत्रणा, विद्युत पुरवठयात खंड वा पुरेसे प्रशिक्षण नसलेला चालकवर्ग असल्यास असे प्रदूषण होते. शेतीस वापरलेले अतिरिक्त पाणी नदीस प्रदूषित करू शकते.

ब) आसवनी-साखर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या मळीपासून अल्कोहोल तयार करणार्‍या. आसवनीमधून स्पॅटवॉश नावाचे अतिशय दाहक, लालभडक, आणि अतिशय जास्त आम्लयुक्त, सेंद्रीय पदार्थ व क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. याचा बी. ओ. डी.४०००० ते ५०,००० मि. ग्रॅ / लि. इतका जास्त असतो त्यामुळे प्रदूषणाचा सर्वात जास्त धोका संभवतो. पारंपारिक पध्दती ह्या स्पेटंवॉशवर मोठया खड्ड्यामध्ये जीवाणू प्रक्रिया केली जात असे. परंतू आता शुध्दीकरणाच्या नव्या पध्दतींचा वापर करने आवश्यक ठरत आहे. साखर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या ’प्रेसमड’ या टाकाऊ घन पदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट करून चांगले खत बनविणे हा प्रकल्प आता बहुतेक साखर कारखान्यांनी हाती घेतला आहे.

क) अ‍ॅसेटोन व अ‍ॅसेटिक आम्ल प्रकल्प यांचे सांडपाणी आम्लयुक्त असल्याने त्याचे चुन्याने उदासिनीकरण करून साखर कारखान्याच्या सांडपाण्याबरोबर त्यावर प्रक्रिया केली जाते.

३) शहरांचे सांडपाणीः शहरांच्या सांडपाण्याच्या प्रश्नाकडे अजून म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही असे खेदपूर्वक म्हणावेसे वाटते. कराड, इस्लामपूर, सांगली येथील सांडपाणी एकत्रीकरण, उपसा व शुध्दीकरण यात अनेक त्रुटी असून सांडपाण्याचा बराच भाग प्रक्रिया न होता नदीत मिसळण्याची परिस्थिती कायम आहे. अशा सांडपाण्यामध्ये रोगजंतूंचा समावेश असण्याची व त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. सांडपाणी शुध्दीकरणासाठी आधुनिक व यांत्रिक पध्दतीचा वापर करावा असे येथे सुचवावयाचे नाही. आधुनिक ख्रर्चिक पध्दतीमुळे चांगले शुध्दीकरण होत असले तरी वीजखर्चामुळे अशी यंत्रणा नियमित चालविणे स्थानिक संस्थांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. परिणामी यंत्रणा बंद पडण्याचा धोका अधिक असतो. त्यापेक्षा कमी खर्चाच्या ऑक्सिकरण तलावासारख्या योजनाही चांगले कार्य करू शकतात. मात्र यासाठी जागा नदीपासून व शहरापासून खूप दूर प्रक्रिया केलेले सांडपाणी केवळ शेतीसच वापरले जाईल याची व्यवस्था करावयास हवी.

प्रदूषणाची सद्यस्थितीः
कृष्णा नदीच्या कराड पासून सांगली पर्यंतच्या प्रदूषणाबाबत १९८६ पासून सातत्याने सर्वेक्षण झाले असून त्यांच्या निष्कर्षानुसार पाण्यात सर्वसाधारणपणे बी. ओ. डी. चे प्रमाण २ ते २.६ मि. ग्रॅ/लि इतका कमी असला तरी जीवाणूंचे प्रमाण (एम.पी.एन) जास्त आढळते. रेठरे नाला व शेरीनाला या दोन प्रमुख नाल्यातील पाणी दूषित असून नदीला जेथे हे पाणी मिळते तेथे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण फार कमी आढळते. क्षारांचे प्रमाण कराडपासून वाळव्यापर्यत सामान्य (कठीणपणा १००-१५०मि. ग्रॅ.लि) असले तरी सांगलीत त्यामध्ये फार वाढ (कठीणपणा ३२५ ते ६०० मि.ग्रॅ/लि) होते. वाळवा ते सांगली दरम्यान बागायती शेतीचे प्रमाण व पाण्याचा वापर जास्त असल्याने तसेच नदीकाठच्या डिग्रजजवळील जमिनी क्षारयुक्त झाल्याने नदीच्या पाण्यात क्षार उतरत असावेत असे वाटते.

कराड पासून सांगली पर्यतचा भाग औद्योगिक दृष्टया विकसित झाला असला तरी तो प्रदुषणाच्या दृष्टीने अधिक नाजूका बनला आहे. प्रत्येक भागाची प्रदूषण सहन करण्याची काही विशिष्ट क्षमता असते. त्यापेक्षा प्रदुषणाची पातळी वाढली की ती विकासात मारक ठरते. त्यामुळे या भागात नवे उद्योगधंदे आणताना फार काळजी पुर्वक विचार करावयास हवा. प्रदुषण नियंत्रणासाठी अशा नव्या उद्योगावर अधिक कडक बंधने घालावयास हवीत.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंद्यांची वाढ आणि शेतीविकास यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या केवळ पावसाळ्यात वाहणार्‍याह असल्याने बिगर मोसमी काळात पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणातून सोडलेल्या. पाण्यावर किंवा बंधार्‍यामागे साठलेल्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. नदी म्हणजे जणू तलावांची साखळीच असते. नदीच्या पाण्याचे प्रदूषण व त्याचे स्वंयशुध्दीकरण याबाबतीत केले जाणारे वैज्ञानिक आडाखे अशा साठविलेल्या पाण्याच्या बाबतीत लागू पडत नाहीत. बहुतेक वेळा हे पाणी स्थिर असल्याने शुध्दीकरणाचा वेग अतिशय कमी असतो. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे व जलप्रदूषणामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत. जलप्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन योग्य ते उपाय केले नाहीत तर नजिकच्या भविष्यकाळात पिण्याच्यां पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईलच पण दूषित पाण्यचा जमीन व इतर पर्यावरण घटकांचाही फार हानीकारक प्रभाव पडेल अशी शक्यता आहे.

फ्लॅश प्रोग्रॅमिंगसाठी अ‍ॅक्शनस्क्रिप्ट

फ्लॅशच्या साहाय्याने आकर्षक जाहिराती तयार करता येतात हे लक्षात आल्यावर फ्लॅश तंत्रज्ञानाकडे जाहिरातक्षेत्राचे लक्ष वळले. फ्लॅशचा उपयोग करून आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून करण्यासाठी पैसा उपलब्ध झाल्याने फ्लॅश तंत्रज्ञानातील सुधारणांस अधिक गती मिळाली. कार्टून फिल्म तयार करताना पूर्वी ज्याप्रमाणे आर्टिस्ट अनेक चित्रे काढत असत, त्याप्रमाणे अनेक लेअर्स व फ्रेम्सवर आकृत्या, चित्रे व मजकूर घालून त्यापासून आकर्षक फ्लॅश मुव्ही करण्याचे तंत्र अनेक व्यावसायिकांनी हस्तगत केले. आजही या पद्धतीने जाहिराती तयार करून देश परदेशातील कामे करणार्‍या कंपन्या भरपूर नफा मिळवीत आहेत.

मात्र अशा पद्धतीमध्ये फ्लॅश मुव्ही करण्यास फार वेळ लागतो. कुशल चित्रकाराची वा ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते व केलेल्या मुव्हीत बदल करणे कठीण असते. यावर उपाय म्हणून फ्लॅश मुव्ही करण्याचे काम प्रोग्रॅम लिहून करता यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. यातूनच अ‍ॅक्शनस्क्रिप्टचा जन्म झाला.

व्हेक्टर व रास्टर इमेज
चित्रांमध्ये दोन प्रकार असतात. एक व्हेक्टर इमेज व दुसरा रास्टर इमेज. चौकोन, त्रिकोण,वर्तुळ यासारख्या आकृत्या काढण्यासाठी त्याचे गणिती सूत्र वापरता येते. याना व्हेक्टर इमेज असे म्हणतात. याउलट फोटोमध्ये चित्रातील प्रत्येक बिंदूला महत्व असते व त्या बिंदूंच्या गुणविशेषांमुळे पूर्ण चित्र साकार होत असते. अशा चित्राला रास्टर इमेज असे म्हणतात. व्हेक्टर इमेजेस काढण्यासाठी गणिती सूत्र वापरावे लागत असल्याने त्यास खूप कमी मेमरी लागते. तसेच त्यात बदलही सहज करता येतात. रास्टर इमेजमध्ये स्थान, आकार व रंगात बदल करता येत असला तरी गणिती सूत्रांचा फारसा उपयोग करता येत नाही. अ‍ॅक्शनस्क्रिप्टमध्ये व्हेक्टर इमेजेस तयार करणे वा त्यात हवे तसे हवे तेव्हा बदल करणे शक्य असते. रास्टर इमेजच्या बाबतीत मात्र यावर मर्यादा पदतात.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १ मध्ये चित्रातील बदल वा कृती याविषयीचा प्रोग्रॅम संबंधित फ्रेममध्ये समाविष्ट केला जात असे. त्यामुळे प्रोग्रॅमचे अनेक तुकडे फ्लॅश मुव्हीमध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले असत व त्यामुळे प्रोग्रॅम समजणे वा त्यात बदल करणे अवघड व जिकीरीचे काम असे.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २ मध्ये फ्लॅश मुव्हीतील सर्व प्रोग्रॅम एकत्र एकाच ठिकाणी लिहिण्याची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर प्रोग्रॅमची फाईल .as या दुय्यम नावाने वेगळी काढून ऊप पद्धतीने क्लास व ऑब्जेक्टच्या परिभाषेत वापरता येऊ लागली. साहजिकच ही भाषा शिकण्यासाठी फ्लॅश सॉफ्टवेअर तसेच प्रोग्रॅमिंग यांचा अभ्यास असणे आवश्यक झाले. मात्र या पद्धतीने केलेली फ्लॅश मुव्ही वापरणे वा त्यात बदल करणे सोपे झाले.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३ मध्ये फ्लॅश मुव्हीसाठी लागणार्‍या सर्व फाईल, डाटा व इतर साधने यांचे xml फाईलच्या स्वरुपात संकलन करून ती अधिक व्यवस्थित, फ्लेक्झीबल ( बदल करण्यास सोपी) व मेमरीचा सुयोग्य उपयोग करणारी बनविण्यात आली.

फ्लॅशचा उपयोगही केवळ जाहिरातीसाठी न राहता शिक्षणासाठी व डाटाबेसवर आधारित माहिती विश्लेषणासाठी एक प्रभावी रॅपिड वेब अ‍ॅप्लिकेशनच्या स्वरूपात होऊ लागला आहे.

नजिकच्या भविष्यकाळात त्रिमिती तंत्रज्ञानाच्या आधारे बांधकाम वा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रकल्पांचे इंटरनेटच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी फ्लॅश / फ्लेक्स आधारित तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासाठी हे तंत्रज्ञान शिकणे फायद्याचे ठरणार आहे. ज्ञानदीपने या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून सध्या परदेशातील एका महत्वाकांक्षी प्रकल्पावर ज्ञानदीपमध्ये काम चालू आहे.